नगर : नगर शहरातील रुग्णालयात मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील कोणत्याही भागातून आलेल्या मृतदेहावर नगरमधील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत आहेत.
मात्र, आता नालेगाव अमरधाम स्मशानभूमीची क्षमता संपली असून, करोनाबाधित मृतदेह लाकडात जाळून अंत्यसंस्कार होत आहेत. त्याचा बाजुच्या वसाहतींना प्रचंड त्रास होत असल्याने किमान शहराबाहेरील मृतदेहांवर त्यांच्या स्थानिक परिसरात अंत्यसंस्कार करावेत, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.
या संदर्भात आमदार जगताप यांनी महापलिका आयुक्त शंकर गोरे यांना पत्र दिले असून, विषयसंदर्भात चर्चा केली. जिल्हाभरातील करोनाच्या मृतदेहांवर नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. दिवस-रात्र अंत्यविधी सुरू असल्याने लाकडाचा धूर होत आहे. तो धूर बाजुच्या वसाहतींमध्ये पसरत आहे. त्याचा खूप त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. तसेच हवेतून त्याचा वास शहरभर पसरतो आहे. त्यातून स्थानिकांच्या जिवालाही धोका होऊ शकतो. त्यामुळे शहराबाहेरुन येणार्या रुग्णांवर ग्रामीण भागातच अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेेंद्र भोसले यांच्याकडेही केली आहे.
जिल्ह्यात करोनाबाधितांचे बळी रोज वाढत आहेत. त्यात नगर शहरातील आणि ग्रामीण भागातील करोनाबाधित असलेल्यांचा मृत्यू झाल्यास त्या सर्वांवर नालेगाव अमरधाममध्येच अंत्यसंस्कार होत आहेत. नगरमधील विद्युत दाहिनीलाही मर्यादा आहेे. सबब, बहुतेक अंत्यविधी आता अमरधाममधील मोकळ्या जागेत लाकडावर केले जात आहेत. त्यातून दिवस-रात्र धूरच पसरत आहे.
दहनामधून निघणारा विशिष्ट प्रकारचा वासही शहरात दूरपर्यंत पसरतो. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच आता करोनाचा प्रादुर्भाव हवेतूनही होत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी देखील अमरधाममध्ये होणारे अंत्यविधी हे स्थानिक स्तरावरच व्हावेत. ज्या तालुक्यातील मयत व्यक्ती आहेत, त्याच तालुक्यात त्यांचा अंत्यविधी व्हावा. ज्यामुळे अमरधाममध्ये होणारी वर्दळ कमी होईल, अशी भूमिका आमदार जगताप यांनी मांडली आहे.