मसूर – भैरवगडावर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीची आमदार बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी पाहणी करून अधिकाऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्या बाबत सूचना केल्या. नवीन कराड उत्तर मतदार संघाचे शेवटचे टोक असलेल्या भैरवगड ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या टोळेवाडी, पिरेवाडी, गवळनवाडी, मानेवाडी या चार वाड्या डोंगर कपारीत वसलेल्या आहेत. गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टोळेवाडीतील घरांना तडे गेले असून काही घरांची पडझड झाली आहे. जमिनीला भेगा पडून जमीन सरकत असल्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावांमध्ये खूप भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.
याबाबतची माहिती कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांना मिळताच त्यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करून ताबडतोब या गावांची पाहणी करण्यासाठी भैरवगड येथे पोहचले. यावेळी सातारच्या तहसीलदार सौ. आशा होळकर, पोलीस निरीक्षक माळी व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी यावेळी आपल्या समस्या मांडल्या.
आमदार बाळासाहेब पाटील यांनी येथील अडीअडचणी जाणून घेतल्या. लोकांना दिलासा दिला. सुरक्षेच्यादृष्टीने लोकांनी येथे न थांबता सोयीच्या ठिकाणी स्थलांतरीत व्हावे व काही अडचण आल्यास प्रशासन आपल्यासोबत राहील अशी ग्वाही दिली. लोकांचे कायमचे चांगल्या ठिकाणी पुनर्वसन होण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून लवकरच शासनाकडे सादर करावा, अशी सूचना तहसीलदारांना केली. तसेच गावातील लोकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले. याप्रसंगी भैरवगड परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.