भुईंज – किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर मंगळवारी दि. 17 मे रोजी झालेल्या सभेमध्ये अध्यक्षपदाची धुरा सर्वानुमते आमदार मकरंद पाटील यांच्यावर सोपविण्यात आली. तर उपाध्यक्षपदी प्रमोद भानुदास शिंदे यांची निवड करण्यात आली.
जिल्ह्यातील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या कारखान्याच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी कोण असणार याची उत्सुकता होती. निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सभा पार पडली. अध्यक्ष- उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी किसन वीर कारखान्याच्या सभागृहात सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद पाटील तर उपाध्यक्षपदी प्रमोद शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी कालच जिल्हा बॅंकेत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, प्रमोद शिंदे, शशिकांत पिसाळ, रामदास इथापे, किरण काळोखे आदी सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत संचालक मंडळाने अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार रामराजे नाईक- निंबाळकर, आमदार मकरंद पाटील यांना दिले होते.
हे दोघे घेतील तो निर्णय मान्य असेल असे सांगण्यात आले होते. किसन वीर कारखान्याच्या सभागृहात निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालत अभिवादन करण्यात आले. यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाचा कामगार व विविध मान्यवरांच्यावतीने सत्कार करण्यात आला. दिवंगत माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी केलेले संस्कार, त्यांची शिकवण व त्यांच्या आशीर्वादाने कारखान्याला ऊर्जितावस्थेत आणणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचा
मोबदला देण्यासाठी जिवाचे रान करणार असल्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी सांगितले. राजेंद्र शेलार यांनी आभार मानले. बैठकीस कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक नितीन पाटील, रामदास इथापे, शशिकांत पिसाळ, प्रकाश धुरगुडे, दिलीप पिसाळ, सचिन जाधव, बाबासाहेब कदम, सचिन साळुंखे, ललित मुळीक, संजय कांबळे, किरण काळोखे, हनुमंत चवरे, रामदास गाढवे, हिंदूराव तरडे, संदीप चव्हाण, शिवाजी जमदाडे, सुशीला जाधव, सरला वीर, शशिकांत पवार, महादेव मसकर, दत्तानाना ढमाल, सत्यजित वीर, कार्यकारी संचालक शिंदे आदी उपस्थित होते.
कारखाना कर्जमुक्त करण्याची जबाबदारी
सर्व सभासदांनी मोठ्या विश्वासाने संचालक मंडळाला मोठ्या मताधिक्क्याने निवडून देऊन संचालक मंडळावर टाकलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने नक्कीच पूर्ण करणार असून कारखाना कर्जमुक्त करून सुस्थितीत आणणे हीच आमची खरी जबाबदारी आहे, असे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.