महाराष्ट्र सदन घेतले ताब्यात
नवी दिल्ली – महाराष्ट्रातील अपंगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनवर मोर्चा काढला आहे. हा मोर्चा महाराष्ट्र सदनवर धडकला असून त्यांनी महाराष्ट्र सदन ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या मानधनात वाढ व्हावी यासह अनेक प्रलंबित मागण्यासाठी आज बच्चू कडू यांनी थेट दिल्लीमध्ये मोर्चा काढला. शुक्रवारी सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा थेट महाराष्ट्र सदनवर धडकला. बच्चू कडू यांनी महाराष्ट्र सदन ताब्यात घेत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सदन न सोडण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला आहे.
दरम्यान, केंद्रीय समाजकल्याण मंत्री थावरचंद्र गेहलोत यांनी बच्चू कडू यांना काल चर्चेसाठी बोलावले होते. महाराष्ट्रातील हजारो अपंगांना घेऊन दिल्लीत दाखल झाल्यामुळे सरकारने याची तात्काळ दाखल घेऊन त्यांना चर्चेस बोलावले होते. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. सरकार सकारात्मक भूमिका घेऊन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत दिल्ली सोडणार नसल्याची भूमिका यावेळी बच्चू कडू यांनी घेतली आहे.