वाघोली (प्रतिनिधी) : हवेली तालुक्यातील 16 गावातील शेत जमिनीवर टाकलेले शेरे त्वरित हटवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची भेट घेऊन मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत शेरे हटविण्याच्या प्रस्तावाची प्रक्रिया पुढील दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले अशी माहिती शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली.
भामा-आसखेड धरणाचा डावा कालवा केवळ कागदोपत्रीच असल्याने व धरणाचे पाणी हवेली तालुक्यातील 16 गावांना मिळणार नसल्याने विभागीय कार्यालयाकडे संबंधित गावातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील शेरे हटवण्यासाठी मागणी केली होती.
या मागणीला जिल्हाधिकारी कार्यालयाने सकारात्मक प्रतिसाद देत प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे 16 गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास आमदार पवार यांनी व्यक्त केला आहे.