‘टेल’ च्या भागात पाणी वाटपाचा घोळ….……
न्हावरे : (योगेश मारणे) चासकमान डाव्या कालव्याच्या पाणी वितरणात अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे शिरूर तालुक्यातील ‘टेल’ कडील भागावर अन्याय झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे शिरूरचे आमदार ॲड.अशोक पवार यांनी शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पायपीट करत कालव्यावर जाऊन पाहणी केली.
तसेच टेल कडील भागात पाणी पोहचले नसल्यामुळे संबंधित चासकमान पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन कॉल करून चांगलेच धारेवर धरले. चासकमान डाव्या कालव्याच्या पाण्याचे वितरण पूर्ण क्षमतेने ‘टेल-टू-हेड’ होणे अपेक्षित होते. तसा पाणी वितरणाचा नियमही आहे.मात्र, अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे सुरू असलेले पाण्याचे आवर्तन बावीस दिवस उलटूनही ‘टेल’ कडील भागात पोहोचलेच नाही.
त्यामुळे टेलच्या भागातील शेतकऱ्यांनी तातडीने आवर्तन मिळावे म्हणून मोठ्या प्रमाणावर मागणी केली होती. त्यामुळेच आमदार पवार यांनी स्वतः शेतकऱ्यांसमवेत कालव्यावर ठिकठिकाणी पायपीट करत जाऊन आंबळे येथे पाण्याच्या पातळीची पाहणी केली. तसेच, ज्याठिकाणी अद्यापपर्यंत चासकमानचे पाणी पोहचले नाही.
तेथे जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कालव्यावर येऊन पाण्याची पातळी चेक करावी व पूर्ण क्षमतेने टेलच्या भागात पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावेत,अशा सूचनाही चासकमान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे यांना दिल्या. पाणी वितरणाबाबत चासकमान पाटबंधारे शिरूर उपविभागाचे उपअभियंता राजेश भावसार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘टेल’ कडील भागात प्रत्येक चारीला तीन दिवस पाण्याचे वाटप होणारा असल्याचे बोलताना सांगितले.
याप्रसंगी आमदार पवार यांच्या सोबत शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागरराजे निंबाळकर, संजय काळे, श्याम काळे तसेच चासकमानचे अधिकारी व पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी आंबळे(ता.शिरूर) येथे कालव्यावरच आमदार पवार यांनी सोशल डीस्टंसिंग ठेऊन उपस्थितांसोबत चर्चा केली.