कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा आरोप
मुंबई : भाजपकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत आहे. कारण भाजप सरकारी यंत्रणांना हाताशी धरून विरोधी पक्ष्यांच्या नेत्यांना धमकावत आहे आरोप माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना त्यांनी सरकारवर हा आरोप केला.
‘सरकारी यंत्रणा विरोधी पक्ष्यातील नेत्यांवर बारीक लक्ष ठेवून आहे. पोलिस यंत्रणेला भाजपसाठी काम करण्याकरता धमकावले जाते आहे. भाजप सरकारने काही लोकांना हाताशी धरून या निवडणुकीत पैसा ओतला आहे. राज्यातून खंडणी उकळण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिस यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. चांगल्या पोलिसांच्या जाणीवपूवर्क बदली होत आहेत. डॉक्टर्स आणि व्यावसायिकांना खंडणीच्या धमक्यांचे फोन येत आहेत’, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
‘दोन वर्षांपूर्वी पालघर येथील पोटनिवडणुकीत असाच प्रकार घडला होता. काही वरिष्ठ पोलिस अधिकारी भाजप सरकारला मदत करत आहेत. माझ्या कुटुंबाने 40 वर्षे सत्ता पाहिली मात्र अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर भूतकाळात कधीही झाला नव्हता’, असेही चव्हाण यांनी म्हटले.
‘अनेक नेते हे रडावर आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलावले जात आहे. मात्र भ्रष्ट्राचाराचे खोटे आरोप लावून नोटीस पाठवली जात आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकवले जात आहे ही गोष्ट एखाद्या नेत्याची राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी पुरेशी आहे. तुम्ही स्वत:ला निर्दोष सिद्धही कराल मात्र तोपर्यंत खूप मोठे नुकसान झालेले असते. या सरकारमधल्या अनेक नेत्यांनी भष्ट्राचार केला आहे पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. अद्यापही पंजाब महाराष्ट्र बॅंकेच्या संचालकांविरोधात का ठोस कारवाई करण्यात आली नाही? असा जाबही चव्हाण यांनी विचारला आहे.