कराड – सध्या विविध शासकीय एजन्सीजचा गैरवापर वाढला आहे. तसेच सत्ताधाऱ्यांकडून या एजन्सीजचा गैरवापर करत जाणीवपूर्वक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला टार्गेट केले जात आहे. मलाही खोट्या केसमध्ये अडकवून माझा छळ करण्यात आला. संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकले. हसन मुश्रीफ यांच्यानंतर आता जयंत पाटील यांनाही इडीच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. हे गलिच्छ राजकारण अतिशय दुर्दैवी आहे, असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
एका खाजगी दौऱ्यानिमित्त माजी गृहमंत्री अनिल देशमुख कराडला आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. श्री. देशमुख म्हणाले, माझ्यावर शंभर कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यात एक कोटी 72 लाखच नमूद करण्यात आले असून हा केवळ विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर फडणवीसच दूरदृष्टीचे नेते आहेत, या सदाभाऊ खोत यांच्या विधानाबाबत त्यांना छेडले असता, देशमुख म्हणाले, सदाभाऊ खोत यांचे राजकीय ज्ञान फार कमी असून शरद पवार यांच्यासारखे दांडगे ज्ञान देशात कोणाचेही नाही. नोटाबंदीने सर्व समाजाला त्रास झाला. आता दोन हजाराची नोट बंद का केली? याला थातूरमातूर उत्तर दिले जात आहे. दरम्यान, जागा वाटपाबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, मुळात काही दिवसांपुर्वी कॉंग्रेसचे आमदार जास्त होते. त्यावेळेला ते मोठे भाऊ होते. आता राष्ट्रवादीचे आमदार, खासदार जास्त असल्याने आम्ही मोठे भाऊ झालो आहोत. महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.