उदयनराजेंचा पवारांवर निशाणा : धैर्यशील कदमच उद्याचा आमदार
मसूर – लोकांनी आमच्या सांगण्यावरुन घड्याळाला मतदान केले. देशात केवळ चार खासदार निवडून आले बाकीचे पडले. राज्य सहकारी बॅंकेत 25 हजार कोटी रुपयांचा गफला होतो आणि तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांची पाठराखण करता, यात आमची चूक होती का? अशा शब्दात शरद पवार यांच्यावर निशाणा साधत पवारसाहेब आमच्याकडून चुका घडल्या असतील. परंतु कधीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही, अशी बोचरी टीका करीत धैर्यशील कदमच कराड उत्तरचा उद्याचा आमदार असेल, अशी खात्री भाजप-शिवसेना महायुतीचे लोकसभेतील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी जनसमुदायाला दिली. मसूर, ता. कराड येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, 370 कलमाला विरोध करून तुम्ही शहिदांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. सातारचे पाणी बारामतीला वळवले, केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले. इतकी वर्षे मराठा आरक्षणाची फरपट केली. तुमच्या माणसांनी भ्रष्टाचार करून राज्य सहकारी बॅंक रसातळाला नेली. यामध्ये आमची काय चूक होती. जनतेचे कुठे चुकले याचा जबाब शरद पवार यांनी सर्वांसमोर द्यावा. आम्ही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणतो. पवारसाहेब तुम्ही उभे राहणार असाल तर मी लढत नाही, अशी भूमिका घेतली. तुमच्यासारख्या ज्येष्ठांचा नेहमीच आदर केला आणि यापुढेही करेन. कौरवांची साथ सोडून पांडवांमध्ये सहभागी झालो. लबाडांची साथसंगत सोडली यात आमची काय चूक होती.
साताऱ्यात काल झालेला पाऊस हा शुभशकुन नव्हे तर त्यांची घाण धुवून टाकण्याचे संकेत आहेत. याची सुरुवात सातारा राजधानीत झाली, याचा मला अभिमान आहे असे सांगून उदयनराजे यांनी भाषणाचा रोख राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्याकडे वळवला. कालची सभा म्हणजे काळूबाळूचा तमाशा होता. ढगाला लागली कळं, राष्ट्रवादीची मतं गळं आणि धनुष्यबाण व कमळ फुलं. राज्याचे दिवाळे निघाले तरी त्यांच्या हाती राज्य सोपवा असे पवारसाहेब म्हणत असतील तर माझी चूकच आहे. त्यांच्या चुकांचे खापर आमच्या माथी फोडू नका. जनताजनार्दन या सगळ्या चुकांची दुरुस्ती महायुतीच्या बाजूने कौल देऊन करेल, असा विश्वासही उदयनराजे यांनी व्यक्त
केला.
मतदारसंघातील 20 वर्षांतील नाकर्तेपणा झाकण्यासाठीच निष्क्रिय आमदारांनी अपक्षाचं पिल्लू उभं केलं. त्यांनी 2009 व 2014 च्या निवडणुकीतील खेळ पुन्हा एकदा खेळलेला. त्यांचा मत विभागणीचा डाव जनता ओळखून आहे. मात्र यावेळी जनता फसणार नाही, असा घणाघाती हल्ला करत केंद्रात महायुतीचे सरकार आहे, राज्यातही महायुतीच येणार आहे. त्यामुळे उत्तरमधून महायुतीचा उमेदवार प्रतिनिधी म्हणून विधानभवनावर पाठवून परिवर्तनाच्या लाटेत सिंहाचा वाटा उचलावा, असे आवाहन उमेदवार धैर्यशील कदम यांनी केले. सभेस बाजार समितीचे चेअरमन हिंदुराव चव्हाण, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते भीमराव पाटील, वासुदेवराव माने, संपतराव माने, भाजपचे नेते जितेंद्र पवार, सागर शिवदास व पंचक्रोशीतून आलेले नागरिक उपस्थित होते.