पुणे – नेहमी गस्त घालणारे, प्रवाशांना शिस्तीचे पालन करायला भाग पाडणारे, रेल्वे गाड्यांमध्ये सुरक्षेसाठी तैनात असणारे आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी विविध “मिशन’ राबवणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) सध्या एक अनोखे “मिशन’ हाती घेतले आहे. मागील काही दिवसांपासून श्रमिक विशेष गाडीतून घरी परतणाऱ्या मुलांसाठी आरपीएफ “मिशन बचपन’ ही अनोखी मोहीम राबवत आहे.
पुण्यातून सुटणाऱ्या श्रमिक विशेष गाड्यांतून सध्या रोज हजारो कामगार, विद्यार्थी आदी प्रवास करतात. अनेक जण लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबेच मूळगावी जात आहेत. पुणे विभागातून बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागांमध्ये गाड्या धावत असल्याने, बहुतेक कुटुंबांचा प्रवास काही तासांचा आहे. या प्रवासामध्ये लहानग्यांच्या चेहऱ्यावर आरपीएफकडून हसू फुलवण्यात येत आहे.
आरपीएफच्या पुणे विभागाकडून लहान मुलांना खाऊ, खेळणी, शालेय साहित्य असे साहित्य देण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 200 हून अधिक मुलांना हे किट देण्यात आले. हे किट दिल्यानंतर मुलांना आश्चर्य वाटत असून, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटत असल्याचे आरपीएफचे कर्मचारी सांगतात.
पुण्यातून श्रमिक गाड्या धावायला सुरुवात झाल्यापासून आरपीएफच्या वतीने श्रमिकांची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यांना प्रवासासाठी फूड पॅकेट देखील देण्यात येत आहेत. त्यांच्या मुलांना आनंद मिळण्यासाठी काही उपक्रम राबविण्याचा उद्देशाने मुख्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर उपलब्ध निधीतून घरी परतणाऱ्या मुलांना आम्ही हे किट देत आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.