पुणे – लॉकडाऊनमुळे पोलिसांनी जागोजागी नाकेबंदी केली खरी परंतु पोलिसांची नजर चुकवून टवाळक्या करत उभे राहणारे आणि रस्त्यांवर फिरणाऱ्या युवकांची संख्याही वाढली आहे. एवढेच नव्हे तर काहीही उद्योग नसल्याने आणि घरात बसवत नसल्याने गल्लीबोळात, इमारतींच्या पार्किंगमध्ये त्या-त्या परिसरातील तरुणांचे जथ्येच्या जथ्ये जमा होऊन गोंधळ घालताना दिसत आहेत. अशा तरुणांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेट लावून नाकाबंदी केली आहे. प्रत्येक वाहनाला आणि दुचाकीस्वाराला अडवून त्याची विचारणा करूनच पुढे सोडले जात आहे. सुरुवातीला काठीचा प्रसाद दिला गेला मात्र टीका झाल्याने पोलिसांनी काठीचा मार बंद केला. मात्र याचा गैरफायदा या टवाळक्यांकडून घेतला जात आहे.