पुणे – नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) याच महिन्यात घेण्यात आलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकालात घोळ असून, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. “एनटीए’ने अनुपस्थित विद्यार्थ्यांचे प्रमाण गृहित धरून पर्सेंटाइल पद्धतीने निकाल जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र तसे न केल्याने पर्सेंटाइलचा फॉर्म्युला चुकला आहे. त्यामुळे जेईई मेन्सचा सुधारित निकाल जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
पर्सेंटाइल पद्धत म्हणजे तुम्हाला दुसऱ्या उमेदवारांच्या तुलनेत किती जास्त गुण मिळाले यावर अवलंबून असते. एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी, विद्यार्थ्यांचा रॅंक, त्याला शंभरने भागून जी आकडेवारी येते, ती म्हणजे पर्सेंटाइल होय. मात्र आताच्या जेईई निकालात केवळ 3 टक्के विद्यार्थ्यांचे पर्सेंटाइल वाढले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत, परंतु त्याचे पर्सेंटाइल कमी झाले आहेत. त्यामुळे निकालात घोळ असल्याचे प्रवेश परीक्षेचे खासगी क्लास घेणाऱ्यांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात आयआयटीन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक प्रा. दुर्गेश मंगेशकर म्हणाले, “निकालाचा फॉर्म्युला चुकल्याने जवळपास 10 पर्सेंटाइलचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याचे निदर्शनास येत आहे. एनटीएने अनुपस्थित विद्यार्थ्यांचे प्रमाण गृहित धरून निकाल जाहीर केल्यास तो प्रमाणित ठरला असता. त्यामुळे आताच्या निकालात विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाइल मिळाल्याचे दिसून येत आहे.’
जेईई मेनचा निकालात चुका आहेत. पर्सेंटाइलनुसार निकाल जाहीर करताना जे निकष निश्चित करण्यात आले आहेत, त्यात प्रत्यक्षदर्शी त्रुटी दिसून येतात. त्यामुळे सुधारित निकाल जाहीर करण्यासाठी “एनटीए’शी पत्रव्यवहार केला आहे. एका दिवसांत सुधारित निकाल जाहीर करता येणे शक्य आहे.
– प्रा. दुर्गेश मंगेशकर, प्रवेश परीक्षा मार्गदर्शक