नवी दिल्ली – कृषी कायद्यात सुधारणा करायला सरकार तयार आहे, याचा अर्थ त्यात काही चुकीचे आहे असे नाही, असे मत व्यक्त करत शेतकऱ्यांची नव्या कृषी कायद्याबाबत विरोधक दिशाभूल करत असल्याची टीका केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केली.
सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास बांधील असल्याचा पुनरूच्चार करत तोमर म्हणाले, कृषी क्षेत्राच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनरात्र मेहनत करत आहेत. कृषी कायद्यांमुळे या क्षेत्रात क्रांती होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांन किमान आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन देत ते म्हणाले, किमान आधारभूत किंमत कायम राहील, त्यात कृषी कायद्याने कोणताही अडथळा येणार नाही. उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के अधिक रकमेची आधारभूत किंमत देण्यास सुरवात केली आहे. कृषी क्षेत्रात आवश्यक असणारी गुंतवणूक मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आत्मनिर्भर योजनेत एक लाख कोटीची गुंतवणूक केली आहे, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्याकडे आमचा कटाक्ष आहे. कोणाला फळे आणि भाज्या रेल्वेने पाठवाव्यात असे वाटत असेल त्यांच्यासाठी वातुकुलीत अशा 100 किसान रेल सुरू केल्या अहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळण्यास मदत होणार आहे.