सैफ अली खानच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता
मुंबई : तान्हाजी चित्रपटात इतिहासाचा चुकीचा अर्थ लावून चित्रण करण्यात आले. यात इतिहासाचा चुकीचा अर्थ लावून तो रंगवला जात होता, याची मला माहिती होती. पण व्यावसायिक यशासाठी अशा पद्धतीचा लोकप्रिय आणि चुकीचा ऐतिहासिक संदर्भ दिला जातो, असे वक्तव्य अभिनेता सैफ अली खानने केले आहे.
या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सैफ अली खानने त्याच्या “तानाजी : द अनंसंग वॉरिअर’वर चर्चा करताना एका मुलाखतीत देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. या चित्रपटात सैफने मुघलांचा सेनापती उदयभान राठोडची भूमिका साकारली आहे. उदयभानाची भूमिका खूपच आव्हानात्मक आणि मजेदार होती. त्यामुळे आपण ती स्वीकारली, असे सैफने म्हटले आहे.
त्यानंतर सैफ अली खानने फिल्म इंडस्ट्रीतील ध्रुवीकरणावरही बोट ठेवले. बॉलिवूडमध्ये बुद्धीजीवींचा आणि देशाचा सांस्कृतिक आवाज आहे. मात्र सध्या मुख्य प्रवाहातील कलाकारांनी लोकप्रिय भूमिका घेतल्याचे दिसत आहे. हे काही चांगले नाही, पण हेच वास्तव असल्याचत त्याने म्हटले आहे.
सैफ अली खान म्हणाला, एखाद्या विषयावर असहमती दर्शवल्यास देशात लोकांना मारले जात आहे. सिनेकलाकारांनी एखाद्या मुद्द्यावर भूमिका घेतल्यास त्यांच्या चित्रपटाच्या कमाईवरही परिणाम होतो. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मात्र आता आपली भूमिका मांडण्याची वेळ आली आहे. सामाजिक मुद्द्यांवर कलाकारांनी भूमिका मांडली तर त्यांचे चित्रपट बॅन केले जातात. त्यामुळे सिनेकलाकार राजकीय भूमिका घेताना अनेकदा विचार करतात आणि असा गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, असेही त्याने स्पष्ट केले.