माधव विद्वांस
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदेपंडित व प्रभावी वक्ते. चित्तरंजन दास यांची आज जयंती. ते “देशबंधू’ या उपाधीनेच ओळखले जात असत. त्यांचा जन्म कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे दिनांक 5 नोव्हेंबर 1870 रोजी झाला. त्यांचे वडील भुवनमोहन कलकत्त्यात वकिली करीत. ते ब्राह्मो समाजाचे होते. विद्यार्थी असल्यापासूनच ते सार्वजनिक व राष्ट्रीय कार्यात भाग घेत असत. चित्तरंजन यांचे शिक्षण कलकत्ता येथे झाले. वर्ष 1890 मध्ये ते बी.ए. झाले, त्यानंतर ते आयसीएस परीक्षेकरिता इंग्लंडला गेले. तेथे ते राजकारणात ओढले गेले. तेथे त्यांनी दादाभाई नौरोजी यांच्या निवडणूक प्रचारसभांतून भाषणे दिली.
याच वेळी मॅक्लिन नावाच्या एका इंग्रजाने हिंदी जनतेविषयी अनुद्गार काढले. तेव्हा त्यांनी इंग्लंडमधील हिंदी लोकांची सभा घेऊन मॅक्लिनचा निषेध केला. एवढ्यावर न थांबता चळवळ करून त्याचे संसदेतील सभासदत्व रद्द करविले. याचा परिणाम म्हणूनच आयसीएस परीक्षेत ते यशस्वी होऊ शकले नाहीत व अखेर बॅरिस्टर होऊन सन 1893 मध्ये भारतात परतले. दरम्यान, त्यांनी इंग्रजी तसेच बंगाली साहित्याचा अभ्यास केला. शेली, ब्राउनिंग, कीट्स, बंकिमचंद्र, गिरीशचंद्र घोष, टागोर हे त्यांचे आवडते लेखक. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन बंगाली साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली. चित्तरंजन यांनी या काळात मालंच हा पहिला भावगीतांचा संग्रह प्रसिद्ध केला. यात देशबंधूंचे सारे वैचारिक तत्त्वज्ञानाचे दर्शन होते. त्यांनी कलकत्त्यास वकिलीस प्रारंभ केला, पण सुरुवातीस फारसा जम बसेना. म्हणून ते ग्रामीण भागात वकिली करू लागले.
चित्तरंजन यांचा विवाह 1897 मध्ये वासंतीदेवी यांच्याशी झाला. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली होत्या. त्यांचा वकिलीत हळूहळू जम बसत होता. या सुमारास वंगभंगाची चळवळ सुरू झाली. अलीपूर बॉम्बकेसमध्ये अरविंद घोष व इतर काही तरुणांवर खटले भरण्यात आले. अरविंद यांच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा चित्तरंजनांनी आपली घोडा-गाडी विकून स्वेच्छेने हा खटला चालविला. अरविंदबाबू निर्दोष सुटले. त्यानंतर चित्तरंजन यांचे वकिली क्षेत्रात मोठे नाव झाले. मोठ्या वकिलांत त्यांची गणना होऊ लागली.
स्वातंत्र्यलढ्यातील अनेक खटले त्यांनी विनामूल्य चालविले. अनेक शैक्षणिक, सामाजिक व राजकीय संस्थांना त्यांनी लक्षावधी रुपयांच्या देणग्या दिल्या. सुरुवातीस त्यांच्यावर टिळक वगैरे जहालमतवाद्यांची छाप होती. बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेल्या चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला. वर्ष 1917 मध्ये ते प्रांतिक परिषदेचे अध्यक्षही झाले. तेव्हापासून अखिल भारतीय राजकारणात त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. 1918 मध्ये त्यांनी मॉंटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांना विरोध केला.
त्यांनी आपली वकिली सोडली व पुढे आपली राहती वास्तू आणि इतर मालमत्ताही कॉंग्रेसला व पर्यायाने देशास समर्पण केली. त्यांनी अहमदाबाद (1921) व गया (1922) येथील कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. पुढे असहकाराची चळवळ शिथिल करण्यात आल्यावर त्यांनी कॉंग्रेस अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. वर्ष 1924-25 मध्ये त्यांनी कलकत्ता महानगरपालिकेचे महापौरपद भूषविले होते. त्या वेळी सुभाषचंद्र बोस त्यांचे साहाय्यक होते.
दार्जिलिंग येथे ते हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. त्यांच्या स्मरणार्थ चित्तरंजन हे शहर वसविण्यात आले.