– माधव विद्वांस
गोविंदा आला रे! अशी आरोळी उठली, 22 जून, 1897 ची रात्र, फटाक्यांचे आवाज होत होते, व्हिक्टोरिया राणीचा राज्यारोहण दिवसाचा हिरक महोत्सव समारंभ आटपून कलेक्टर रॅंड पुण्याच्या राजभवन वरून गणेश खिंड रस्त्यावरून येत होता.
दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव तीनही चापेकर बंधू दबा धरून बसले होते. वासुदेव यांनी परवलीची आरोळी ठोकली आणि बाळकृष्णास सावध राहण्याची सूचना दिली. बाळकृष्णाने गोळी झाडली; पण ती सुरक्षा रक्षकास लागली.
दामोदर यांच्या लक्षात येताच त्यांनी बग्गीवर उडी घेऊन पुन्हा नेम धरला आणि रॅंडचा खून केला. लगेच बाळकृष्ण यांनी रॅंड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. यात दोन्ही अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.
या घटनेच्या मागची पार्श्वभूमी पुण्यातील वर्ष 1897 मधील प्लेगच्या साथीत आहे. प्लेग पीडित रुग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर इंग्रजांनी पुण्यातील घराघरांत शोध मोहीम उघडली. त्यावेळी जनतेस अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली.
चापेकर बंधूंचा जन्म हरिभाऊ चापेकर या एका कीर्तनकारांच्या घरी झाला. त्यांच्यावर लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव होता. लहानपणापासूनच चापेकर बंधूना व्यायामाची आवड होती.
समवयस्क मित्रमंडळींना संघटित करून त्यांनी एक व्यायामशाळा सुरू केली होती.इंग्रजांच्या अत्याचाराची दामोदरपंतांना मनस्वी चीड होती. दामोदरपंतांचे लहान भाऊ बाळकृष्ण हरि चापेकर व वासुदेव हरि चापेकर दोघेही त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी असत. पुण्यातील प्लेगच्या साथीत ब्रिटिशांनी जनेतेचे हाल केल्यामुळे असंतोष भडकला होता.
चापेकर बंधू त्यावेळी निसटण्यात यशस्वी झाले असले, तरी नंतर तिघांनाही पकडण्यात आले. कित्येक दिवस ब्रिटिशांना मारेकऱ्यांचा शोध लागत नव्हता. मात्र द्रविड बंधूनी चापेकर यांना पकडवून दिले.
बालकृष्ण हरि चापेकर रॅंड खुनानंतर कर्नाटकातील अनेगोंदीच्या जवळील गंगावटी गावाजवळील शिळांच्या डोंगरकपारीत सहा महिने दडून बसले होते व स्थानिक लोकांनी त्यांना खूप सहकार्य केले होते.
रायचूरचा पोलीस अधिकारी स्टीफन्सन याने त्यांना अटक केली. याची गुप्तता पाळण्यात आली होती. दामोदर चापेकर यांना 18 एप्रिल 1898 रोजी फाशी देण्यात आली. त्यापाठोपाठ वासुदेव चापेकर यांना 8 मे 1899 तसेच बाळकृष्ण चापेकर यांना 16 मे 1899 रोजी फासावर चढवण्यात आले.
फाशीसमयी दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव अनुक्रमे 27, 24 आणि 18 वर्षे वयाचे होते. तिघांचे त्या काळातील प्रथेनुसार लहानपणीच विवाह झाले होते. वासुदेवाची पत्नी सीता पती निधनाच्या धक्क्यामुळे दुसऱ्या महिन्यातच निधन पावली.
बाळकृष्णाची पत्नी गंगूबाई आणि दामोदरपंताची पत्नी दुर्गाबाई यांनी पुण्यातून आपला मुक्काम हलवून चिंचवडमधील वडिलोपार्जित “चापेकरवाड्या’त मुक्कामास आल्या.
तीन भावांपैकी फक्त दामोदरपंताना “धोंडीराम’ नावाचे अपत्य होते. 1970 नंतर पुण्यातील इतिहासप्रेमी मंडळींनी अशी स्फूर्तीदायक इतिहासकालीन वाडे जतन करण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर त्या निमित्ताने 1972 मध्ये “चापेकर स्मारक समिती’ची स्थापना झाली आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही पुढाकार घेऊन तो वाडा समितीकडे सोपविला.