वासाचा पहिला पाऊस येतो तोच मुळी मिरगाचा सांगावा घेऊन. ऊन्हाळलेल्या मातीला सरसरून दरवळाचा मोहर फुटतो आणि शेताच्या बांधावर, घराच्या अंगण, परड्यात मिरगाचा किडा (इंद्रगोप) मिरगाचा मुराळी म्हणून येतो. मला अजूनही आठवतयं तो दिसला की, बायाबापड्या त्याला हळद कुंकू लावून त्याची पूजा करायच्या. पावसाचा हा हंगाम दमदार बरसू दे… पीक पाणी म्वाप येवू दे… घरदार गौरीच्या पावलानी ऊजळू दे म्हणून प्रार्थना करायच्या.
शेवग्याच्या पानांची भाजी,भाकरी असा “निवद’ मिरगाला दाखवला जायचा आणि चांगला बरस रे बाबा… म्हणून हात जोडले जायचे. पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात ही जरी “रोहिणी’ नक्षत्रापासून होत असली, तरी पावसाच्या आगमनाचा खरा आनंद हा “मृग’ नक्षत्रापासूनच सर्वत्र साजरा केला जातो. “मृग नक्षत्र’ हे आकाश मंडपातलं वैशिष्ट्यपूर्ण देखणं असं नक्षत्र मानलं जातं. सामान्यत: 7 किंवा 8 जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो, असं मानलं जातं.
कोसळे मृगधार कलत्या सांजवेळी
रान झाले चिंब, धरणी चिंब ओली
मिरगाच्या पावसाचे वर्णन करणारी ही कवीता मिरगाच्या पावसाबद्दलची आपली ओढ व्यक्त करते. वासाचा पहिला मिरगाचा पाऊस हा जणू मातीचा प्रियसखाच आहे. जो येतो आणि तिला दरवळतो प्रितसुखाचा अनुभव देवून…
महर्षी वाल्मिकीने रामायणाच्या किष्किंधाकांडात मिरगाचं पुढील प्रकारे वर्णन केलं आहे-
अयं स काल: सम्प्राप्त: समयो।द्य जलागम:।
सम्पश्च त्वं नभो मेघै: संवृतं गिरिसंनिभै:।्।
आधुनिक वाल्मिकी कवी ग. दि. माडगूळकरांनी-
माऊलीच्या दुधापरी । आले मृगाचे तुषार
असं म्हणताना मृगाच्या सरींना “आई’च्या जीवनदायक दुधाची उपमा दिली.
मृग नक्षत्र आणि “पहिल्या पावसाची’ ओढ ही केवळ माणसालाच नाही, तर साऱ्या आसमंताला लागलेली असते. आपला देश कृषिप्रधान असल्यामुळे “काले वर्षतु पर्जन्य:, पृथिवी सस्यशालिनी’ ही या देशाची धारणा आहे.
मिरगाचा मखमली किडा दिसला की शेत भाजणीची लगबग सुरू व्हायची… मिरग आला गड्याहो… असं म्हणत पारावर शेतीमातीच्या गप्पा चालू व्हायच्या… वख्खर धरायची जुळणी सुरू व्हायची. नांगराच्या फाळांची डागडुजी सुरू व्हायची… काळ्या आईला नवीन रूपात पहायची स्वप्नं बघत या मिरगाची वाट पाहिली जायची.
भुईमूग, मूग, उडीद, चवळी, थोडं पापडी, तूर गोळा केल्या जायच्या. नांगरट केलेली ऊन्हानं तापलेली शेतं परत काकरली जायची. काकरून फुटलेल्या ढेकळातून निघालेले गवत एक एक गड्डा वेचून बांधावर टाकलं जायचं. असं एकसारख्या नांगरलेल्या मातीच्या ओळी बघताना वाटायचं की, प्रत्येक ओळ आता काही दिवसांनी हिरवा मखमली शालू नेसून नव्या नवरीसारखी नटेल आणि हळदुल्या ऊन्हात चमचम करेल. एकसारख्या दिसणाऱ्या निर्मळ ओळींच ते लेणं दृष्ट काढावी इतकं सुंदर दिसायचं…
वावरात पेरणीची धांदल सुरू झाली की, इकडे पाखरांचीही दाणे वेचण्यासाठीची गडबड सुरू व्हायची. कावळे, मैना, चिमण्या असे सारेच दाणे टिपायला गोळा व्हायचे. अंकुरलेले भुईमुगाचे दाणे हा तर या पाखरांचा आवडता खाऊ. जरा मातीतून बाहेर डोकावण्याचा अवकाश… गट्टम केलाच म्हणून समजायचा.
या पाखरांना हुसकणं हे आम्हा पोरांच काम. हातात शेमला घेऊन नांगरलेल्या ओळींतून पाखरांमाग धावत सुटायचं आणि अचानक आभाळाचा एक कोपरा काळवंडायचा. त्याच्याकडे पाहत मिरग आला जणू… असा अदमास घेतला जायचा. भराभरा ढगांचे काळे लठ्ठ पुंजके जमा व्हायचे… सगळी झाडं, पाखरं, माणसं सावधान अवस्थेत त्या ढगांच्या बरसण्याची वाट पाहायचे आणि तो सुरू करायचा आपल्या सरींची उधळण… आणि हा हा म्हणता मिरग पडायला लागतो.
तो थोडा तरी शिपला म्हणजे यंदा पाऊस चांगला होईल, अशी आशा असायची.
दिवसभर कामानं आंबलेली दमूनभागून रानातून आलेली माणसं अंगणात खाटेवर आडवी होऊन आभाळातल्या चांदण्या मोजायची. मिरग पडणारच असं स्वतःला समजवायची. हिरवं सपान त्यांच्या थकल्या नजरेत तो मिरग रुजवायचा. मिरगाच्या पहिल्या दिवशी आजी आठवणीनं शेवग्याच्या पाल्याची भाजी करायची. सोबतीला कांदापात असायची.
मी आजीला हमखास विचारायचे. ही भाजी खाल्ली की मिरग सुखावतो आणि मायंदाळ पाऊस देतो, असं आजी सांगायची. वैरण काडी सगळं कसं तो यायच्या आधी सुरक्षित ठेवलं जायचं. पडव्या, गोठे यांची छपरं शाकारली जायची. जितराबांसाठी गोणपाटं जमवली जायची. पावसानं गारठली की, त्यांच्या अंगावर गोणपाटं अंथरली जायची.
पहिला पाऊस म्हणजे प्रत्येक शेतकरी बापासाठी डोळ्यांतल्या आंनंदाश्रूंचा, सुखाच्या सरींचा क्षण असतो. मिरग वेळेवर बरसला म्हणजे यंदा घर भरणार याची खात्री असते. हा बरसणारा पहिला पाऊस बरसतो अन् येणाऱ्या मिरगाची चाहूल देऊन जातो…
आताही गावाकडं वावरात, अंगणात मिरगाचा किडा दिसेल आणि मिरगाच्या स्वागताची तयारी सुरू होईल. मर्ढेकरांच्या शब्दांत सांगायचं तर हा “पाऊस पाडवा’ मिरगाच्या साथीत साजरा होईल. सारी उन्हावलेली मन या मिरगाच्या सरींनी धुंद होतील आणि म्हणतील… वासाचा पयला पावशे आयला… नभाचे घुमड मातीये भा रीयेला…
मानसी चिटणीस