भारत सरकारच्या मते 90 टक्क्यांहून अधिक रुग्ण घरी राहूनच बरे होत आहेत. या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता वाटत नाही. मात्र तरीही त्यांनी कोव्हिडमधून बरं झाल्यानंतर सतर्क राहण्याची गरज आहे. सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना पूर्णपणे बरं व्हायला 2 ते 8 आठवड्यांचा वेळ लागू शकतो. हा कालावधी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो.
अशक्तपणा, काम केल्यानंतर थकवा येणं, भूक न लागणं, खूप झोप येणं किंवा झोप न लागणं, अंगदुखी, अस्वस्थपणा अशी लक्षणं सौम्य कोव्हिड19 रुग्णांमध्ये बरं झाल्यानंतरही दिसून येतात.
जर तुम्हाला बरं वाटत असेल, तर निगेटिव्ह रिपोर्टसाठी पुन्हा टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. 14 दिवसांनंतर आयसोलेशनमधून तुम्ही बाहेर येऊ शकता. भारत सरकारनेही यासंबंधी सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. बरं होत असताना खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. प्रोटीन आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे, कारण या आजारात शरीराची प्रतिकारक्षमता कमी होते.
जर भूक लागत नसेल, तर थोड्या-थोड्या वेळानं खा आणि भरपूर पाणी प्या. नियमित योगा आणि प्राणायाम करा. श्वसनाचे व्यायाम करा. एकाचवेळी खूप कामं करू नका. बरं झाल्यानंतर काही दिवस (15 ते 30) ऑक्सिजन पातळी, ताप, ब्लड प्रेशर, शुगर तपासत राहायला हवी. गरम किंवा कोमट पाणीच प्या. दिवसातून दोन वेळा वाफ नक्की घ्या. 8-10 तासांची झोप गरजेची आहे. नीट विश्रांती घ्या. सात दिवसांनंतर डॉक्टरांकडे फॉलो-अपसाठी नक्की जा.
कोव्हिड19 ची सौम्य लक्षणं असलेले रुग्ण 10 ते 15 दिवसांत त्यांची कामं सुरू करू शकतात. हळूहळू दैनंदिन कामं पूर्ववत करू शकतात. डॉक्टरांनी जर काही औषधं-गोळ्या बरं झाल्यानंतरही घ्यायला सांगितली असतील तर ती आवर्जून घ्या. कोणतीही औषधं बंद करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जर कोणत्या सहव्याधी असतील तर डॉक्टरांनी बरं झाल्यानंतरही घ्यायला सांगितलेली औषधं काळजीपूर्वक घेतली पाहिजेत. अशा रुग्णांनी विशेष काळजी घ्यायला हवी.
कोव्हिडमधून ठीक झालेल्या रुग्णांनी धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहण्याचाही सल्ला दिला जातोय. घरी राहून बरं झालेल्या रुग्णांनी आपल्या शरीरातील बदलांकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं. एखादी गोष्ट लक्षात येत नसेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे.
गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांनी काय करावं?
जे गंभीर रुग्ण कोव्हिडमधून बरे होऊन घरी आले आहेत, त्या सर्वांसाठी एकसारखी गाईडलाइन असू शकत नाही. रुग्णांची रोग प्रतिकारकशक्ती आणि केस-टू-केस प्रतिसादाच्या आधारेच याकडे पहायला हवं. शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राहण्यासाठी द्रव पदार्थांचं सेवन, चांगला आहार आणि थकवा येईल एवढ्या प्रमाणात काम न करणं ही पथ्यं तर गंभीर संसर्गातून बरं झालेल्या रुग्णांनी पाळणं आवश्यक आहे. ज्या रुग्णांमध्ये गंभीर लक्षण दिसतात त्यांना बरं होण्यासाठी तीन महिन्यांपर्यंत कालावधी लागू शकतो. जे रुग्ण जास्त दिवस रुग्णालयात उपचार घेऊन परतले असतील, त्यांची प्रकृती सुधारण्यास इतरांच्या तुलनेत अधिक वेळ लागू शकतो.
मात्र या काळात त्यांनी केवळ अंथरुणावरच पडून राहायला हवं असं नाही. त्यांनी बरं झाल्यावर श्वसनाचे व्यायाम, प्राणायम करून दिवसाची सुरूवात करावी. हळूहळू आपल्या दिनचर्येतील इतर गोष्टी सुरू करायला हरकत नसते. अशा रुग्णांना मानसिक-सामाजिक आधाराची अधिक गरज असते. विशेषतः वृद्ध आणि इतर आजार असलेल्या व्यक्तिंना. घरी आल्यावरही ऑक्सिजनची पातळी तपासणं किंवा स्वतःला ऑक्सिजन लावणं, वेळच्या वेळी औषधं खाणं- अशा छोट्या छोट्या गोष्टीही मानसिकदृष्ट्या या रुग्णांसाठी त्रासदायक ठरु शकतात. अशा परिस्थितीत कुटुंब आणि आजूबाजूच्या लोकांचं सहकार्य महत्त्वाचं ठरत. आवश्यकता वाटल्यास मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन घ्यायलाही हरकत नाही. सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे.