नियमित भरती चालू ः नव्या जागा निर्माण करण्यास मनाई
नवी दिल्ली – अनावश्यक खर्च टाळण्यासाठी अर्थमंत्रालयाने आक्रमक बचत मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार अर्थ मंत्रालयाने इतर सर्व मंत्रालयाला नवीन जागा (पोस्ट) निर्माण करण्यास मनाई केली आहे. महसूल कमी झाल्यामुळे सरकारची तूट दुपटीने वाढणार आहे. यासाठी कोणत्याही विभागाने नवीन जागा निर्माण करू नये, असे सांगण्यात आले आहे. खर्च हाताळणाऱ्या विभागाने सर्व मंत्रालयाना याबाबत पत्र पाठविले आहे.
अर्थमंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार फक्त परदेशातील भारतीय वकिलातींना परदेशात छपाई करता येईल. मात्र, देशातील कोणत्याही विभागाला आयात कागदावर पुस्तकाची किंवा इतर प्रकाशने छपाई करता येणार नाही. वर्धापन दिन साजरा करणे टाळावे गरज पडल्यास मर्यादित स्वरूपात कार्यक्रम घ्यावे, अशा कार्यक्रमासाठी प्रवास करू नये, असे अर्थमंत्रालयाने बजावले आहे.
विविध विभागांनी कन्सल्टिंगची कामे कमीत कमी देण्याचा प्रयत्न करावा. फारच गरज असेल तर कन्सल्टंट नेमावेत. अर्थमंत्रालयाने केलेल्या या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या मुख्य सचिवाकडे असेल.
भारताचा पहिल्या तिमाहीतील विकासदर उणे 23.9 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये अनावश्यक खर्च टाळून फक्त आवश्यक खर्च करण्याचे सरकारने ठरविले आहे. विकासदर शक्य तितक्या लवकर वाढावा यासाठी सर्व मंत्रालयाला प्रयत्न करण्यास सांगितले आहे.केंद्र सरकारने घेतलेले कर्ज राष्ट्रीय उत्पन्नाच्या 70 टक्क्यांवर गेले आहे. प्रत्यक्ष कर संकलनही कमी होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आक्रमक बचत मोहीम सुरू केली आहे.
दरम्यान या विषयावर बरीच टिका झाल्यानंतर अर्थमंत्रालयाने नियमित भरती चालू राहील, असे स्पष्टीकरण केले आहे. यात कसलाही खंड पडणार नाही.
डायऱ्या, कॅलेंडरची छपाई नको..
आर्थिक अडचणी वाढल्यामुळे कोणत्याही विभागाने या वर्षी कॅलेंडर किंवा डायऱ्यांची छपाई करू नये, असे सांगण्यात आले आहे. विभागांनी फक्त आवश्यक तोच खर्च करावा. मात्र, अनावश्यक खर्च पूर्णपणे टाळावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. डायऱ्या आणि कॅलेंडरवरील खर्च कमी करण्याची वेळ सरकारवर आली आहे.