शेतकऱ्यांनी केली नुकसानभरपाई देण्याची मागणी
परिंचे – मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काळदरी (ता. पुरंदर) येथील भातशेती व घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. शेतातील ताली व बांध पडले आहेत. त्यामुळे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती, परंतु काळदरी येथे झालेल्या नुकसानीकडे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पावसामुळे बांदलवाडी येथे सात घरांचे मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे भाताची रोपे वाहून गेली असून शेतातील ताली पडल्या आहेत. या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील आरोग्य केंद्र बंद असून कोणत्याही प्रकारची आरोग्य सेवा येथील नागरिकांना मिळत नाही. मोठ्या प्रमाणात हानी झाली असून राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह या विभागातील जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांनी या परिसरात डोकावून सुद्धा पाहिले नाही.
काळदरी गावाचे सरपंच अंकुश परखंडे म्हणाले की, पहिल्या पावसात भाताची रोपे वाहून गेल्यामुळे परिसरात रोपांची टंचाई भासत आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाताची रोपे बाहेरून खरेदी करून लागवड केली आहे. अनेक शेतात ताली व बांध फुटले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.