अमरावती – दिवाळीनंतरही करोनाचा संसर्ग वाढतच राहिला तर, राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सुरू करणे अशक्यच राहील, अशी शक्यता शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील सर्वच शाळा-महाविद्यालये बंद आहेत. काही दिवसांपूर्वी दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे संकेत कडू यांनीच दिले होते. मात्र आता त्यांनीच ही शक्यता कमी असल्याचे संकेत दिले आहेत.
आपण आधी ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये आणि आता दिवाळीनंतर शाळा सुरू करता येईल का, याचा विचार करत होतो. मात्र, करोनाची वाढती परिस्थिती पाहता दिवाळीनंतर याची दुसरी लाट आली आणि संक्रमण वाढले तर आपल्याला दिवाळीनंतरही शाळा बंद ठेवाव्या लागणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
करोनाचे संक्रमण आतापेक्षा कमी झाले तर त्यावेळी शाळा सुरू करता येतील. परंतु आपण जगाचा विचार केला तर, 13 हजार विद्यार्थी ब्रिटनमध्ये करोनाबाधित झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आपण खबरदारीने पावले उचलायला हवी, असे त्यांनी सांगितले.