मुंबई : परदेश शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्याच शाखेतून पदवी घेण्याबाबत असलेले बंधन शिथिल करण्यात आले आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन माहिती दिली.
परदेश शिष्यवृत्तीसाठी ज्या शाखेत पदव्युत्तर प्रवेश त्याच शाखेचे पदवी शिक्षण अनिवार्य हा नियम आता रद्द करण्यात आला असून नव्या नियमानुसार परदेशी विद्यापीठाने एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश दिला असेल व त्याचे पदवी शिक्षण अन्य शाखेतून पूर्ण असेल तरीही त्याला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळवता येणार आहे.
तसेच पदव्युत्तरसाठी वयोमर्यादा ३५ वर्षे व पीएचडी साठी ४० वर्षे अशीच राहील. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन/ई-मेलद्वारे अर्ज दाखल करावेत. १४ ऑगस्ट पर्यंत दिलेली मुदतही वाढविण्यात येईल अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
दरम्यान, ज्या शाखेतील पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल, असा निर्णय भाजप सरकारच्या काळात घेण्यात आला होता, हा भाजप सरकारच्या काळात घेण्यात आलेला निर्णय धनंजय मुंडेंनी मागे घेतला आहे, त्यामुळे परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.