पुणे – राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्वावर (सीएचबी) सहायक प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने तीन महिन्यांपूर्वी राज्य शासनाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविला आहे.
त्यावर निर्णय घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना अद्याप मुहूर्तच सापडलेला नाही. ही पदभरती करण्याबाबत 21 दिवसांपूर्वी शिक्षणमंत्र्यांनी केलेली घोषणाच हवेत विरली आहे.
राज्य शासनाने 3 नोव्हेंबर 2018 रोजी 40 टक्के पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची पदे भरण्यास मान्यता दिली. त्यानुसार 3 हजार 580 पदे भरण्यास मंजुरीही मिळाली.
राज्यातील 1 हजार 77 पैकी केवळ 317 अनुदानित महाविद्यालयांनी भरतीची “एनओसी’ मिळवून 1 हजार 351 पदांचीच भरती पूर्ण केली. उर्वरित पदांसाठीची प्रक्रिया काही ना काही कारणांनी रखडली आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या वित्त विभागाने 4 मे 2020 रोजी कोणतीही नवीन पदभरती करण्यास बंदी घातली.