मुंबई – राजकीय पुढाऱ्यांनी समाजातील महागाई, गरिबी, रोजगार, शेतकऱ्यांबद्दल बोलले पाहीजे. पण काही नेते हे विषय सोडून विनाकारण चुकीचा इतिहास तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.
जितेंद्र आव्हाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या प्रत्येक आरोपाला ऐतिहासिक दाखले आणि अभ्यासपूर्ण संदर्भ देऊन प्रतिवाद केला. तसेच तुम्हाला भोंग्यावर बोलायचं असेल तर बोला, पण इतिहासाला हात घालू नका, असेही सुनावले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवरुन राज ठाकरे यांनी वाद सुरु केला. यावर जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले देऊन महाराजांची समाधी ही छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली असल्याचे सांगितले. 1869 साली महात्मा जोतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन समाधीस्थळी स्वच्छता केली. त्याची बातमी नारायण मेघजी लोखंडे यांनी दिनबंधू वर्तमानपत्रात छापून आणली होती. फुलेंचा पत्रव्यवहार, शाहू महाराजांचा पत्रव्यवहार आजही आर्काईव्हजमध्ये उपलब्ध आहे. फुलेंनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पहिली सभा घेतली होती, त्या सभेला करवीर संस्थानचे प्रमुख आबासाहेब घाटगे उपस्थित होते. आबासाहेबांनी त्यांचे अभियंते रायगडावर पाठवले देखील होते. मात्र सहा महिन्यातच त्यांचे निधन झाले. कालांतराने महात्मा फुलेंचेही निधन झाल्यामुळे ही मोहीम थांबली. त्यानंतर 1895 साली लोकमान्य टिळकांनी हे काम हाती घेतले. त्यावेळच्या सर्व संस्थानिकांना त्यांनी सोबत घेतले. लोकमान्य टिळक हे फक्त दोन वेळा रायगड किल्ल्यावर गेले होते, असे इतिहासात नमूद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र नसल्यामुळे त्यांनी नाना फडणवीसांचे छायाचित्र सिंहासनावर ठेवल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. 1920 साली टिळकांचे निधन झाले, तोपर्यंत समाधीसाठी काहीही काम झाले नव्हते. त्यांनी समाधी जीर्णोद्धार समिती स्थापन केली होती, त्यासाठी निधी गोळा केला होता. मात्र तो निधी ज्या बँकेत ठेवला होता, ती बँक बुडाल्याचे सांगितले गेले. समाधी जीर्णोद्धार समिती काम करत नसल्यामुळे 1926 साली ब्रिटिशांनी समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम स्वतःकडे घेतले.
या इतिहासाबाबत मी कुणाशीही चर्चा करण्यासाठी तयार आहे. वर्तमान इतिहासकारांनाही हे संदर्भ माहीत आहेत. इतिहास असा कुणाच्याही नावावर खपवता येत नाही. चुकीचा इतिहास सांगूनच समाजाचे वाटोळे केले, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
भारतात ज्यांनी खरा इतिहास लिहिला त्यांची खूप मोठी परंपरा आहे. अनेक ब्राह्मण लेखकांनी इतिहास लिहिला आहे, त्यावर आमचा आक्षेप नाही. पण पुरंदरेंनी इतिहास नाही, तर कादंबरी लिहिली आहे. कादंबरी इतिहास नसते. इतिहास हा जातीचा, धर्माचा नसतो, असे आव्हाड यांनी सांगितले.
पुरंदरे यांच्या जातीवरुन राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना मंत्री आव्हाड म्हणाले की, शरद पवार यांनी कधीही जातीभेद केला नाही. कुसुमाग्रज यांच्या नावावरुन दिला जाणारा पुरस्कार सुरु करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. विरोधी पक्षात असतानाही शरद पवार यांना अनेक साहित्य संमेलनांचे उद्घाटक म्हणून साहित्यिकांनी बोलावले होते. मग हे सर्व साहित्यिक विकले गेले होते का? एस.एम. जोशी यांच्यापासून अनेक ब्राह्मण नेत्यांसोबत शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पण जाणीवपूर्वक अपप्रचार करुन महाराष्ट्र पेटवण्याचे कारस्थान काही लोक करत आहेत, अशी टीका मंत्री आव्हाड यांनी केली. पुरंदरेंच्या साहित्याला ज्ञानपीठ का नाही मिळाला? किंवा ऐतिहासिक लिखाणाबद्दल त्यांना एकाही विद्यापीठाने डॉक्टरेट का नाही दिली? असेही प्रश्न मंत्री आव्हाड यांनी उपस्थित केले.
तरुणांमध्ये चुकीचा इतिहास जात आहे. राज ठाकरे शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही, असा आरोप करतात. पण चैत्यभूमीपासून अगदी जवळ राहत असूनही राज ठाकरे चैत्यभूमीवर आजवर का नाही गेले? असा प्रतिप्रश्न मंत्री आव्हाड यांनी उपस्थित केला.