अमरावती -आंध्रप्रदेशचे मंत्री पी.रामचंद्र रेड्डी यांना राज्याचे निवडणूक आयुक्त रमेश कुमार यांच्याविरोधातील वक्तव्य भोवले आहे. निवडणूक आयुक्तांनी रेड्डी यांना काही दिवस घराबाहेर पडण्यास मनाई करणारा दुर्मिळ आदेश जारी केला आहे.
वायएसआर कॉंग्रेस पक्षाची सत्ता असणाऱ्या आंध्रात 9 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत चार टप्प्यांत ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. अशात राज्याचे पंचायत राज आणि ग्रामविकास मंत्री असणाऱ्या रेड्डी यांची दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी अविचारी निवडणूक आयुक्तांच्या सूचनांचे पालन करू नका; अन्यथा कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना दिला. निवडणूक आयुक्तांना भविष्यात खासदारकी किंवा आमदारकी मिळण्याची आशा आहे. त्यामुळे ते विरोधी पक्षाला (तेलगू देसम) अनुकूल ठरणारे निर्णय घेत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या वक्तव्यांची गंभीर दखल निवडणूक आयुक्तांनी घेतली.
ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया संपेपर्यंत रेड्डी त्यांच्या घरातच राहतील याची निश्चिती करावी, असा आदेश निवडणूक आयुक्तांनी आंध्रच्या पोलीस प्रमुखांना दिला. मागील काही काळापासून आंध्र सरकार आणि निवडणूक आयुक्तांमध्ये संघर्ष सुरू आहे. ताज्या घडामोडींमुळे तो आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.