नवी दिल्ली – आमचा नंबर एकचा शत्रू कॉंग्रेस, दोन नंबरचा शत्रू एमआयएम आहे. आणि तिसरा शत्रू कम्युनिस्ट आहेत. त्यामुळे एमआयएम ही आमची बी काय झेड टीमही असू शकत नाही. जनतेचा अंदाज घेण्यासाठी राष्ट्रवादीने टाकलेली ही गुगली आहे.
राष्ट्रवादी गेला बाजूला, कॉंग्रेस गेला बाजूला, शिवसेनाच आतून एमआयएमशी हातमिळवणी करतेय की काय, अशा प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण शिवसेनेने आतापर्यंत जे जाहीरपणे म्हटलेले नाही, तेच केले आहे अशी टीका भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.
एमआयएमला महाविकास आघाडीत येण्यापासून फटकारणाऱ्या शिवसेनेवर दानवे यांनी टीका केली. तसेच कॉंग्रेसला आणि राष्ट्रवादीला दलितांची मते लागतात पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत. मुस्लिमांची मते लागतात, पण एमआयएम पक्ष चालत नाही, ही यांची नीती आहे, असे म्हणत दानवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसनेच कसा उमेदवार उभा केला, याचा दाखला दिला. तसेच शिवसेनेमध्ये आता दाखवण्यासाठीही हिंदुत्व राहिले नाही, त्यामुळे ते वारंवार आम्ही हिंदुत्ववादी आहोत, असा उल्लेख करत सुटलेत, अशी खोचक टीकाही दानवे यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यात उभे राहिले होते. कॉंग्रेसने उमेदवार उभा केला. पंडित जवाहरलाल नेहरू प्रचाराला आले. बाबासाहेबांचा पराभव केला. बाबासाहेब दादरमध्ये लोकसभेला उभे राहिले. त्या ठिकाणीही कॉंग्रेसचा उमेदवार उभा राहिला.
बाबासाहेबांचा पराभव केला. एका बाजूला दलितांचे मत लागतात, पण दलितांचा नेता लागत नाही. तशी एमआयएमची मुसलमान मते लागतात, पण पक्ष लागत नाही. ही यांची नीती आहे, आता सर्वांनी ओळखून घेतले आहे, अशी जोरदार टीका रावसाहेब दानवे यांनी केली.