नवी दिल्ली – लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच एलआयसीच्या शेअर बाजारातील बाजार मुल्यामध्ये तब्बल 35 टक्के घट झाली आहे, यावरून कॉंग्रेसने मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. एलआयसीची शेअर बाजारातील नोंदणी होऊन एक वर्षच झाले आहे.
कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आजच्याच दिवशी वर्षभरापूर्वी सरकारी मालकीची एलआयसी ही कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध झाली होती. तेव्हा त्याचे बाजार भांडवल मूल्य 5.48 लाख कोटी रुपये होते. आज ते 3.59 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे ही घसरण तब्बल 35 टक्के आहे. या प्रक्रियेत लाखो पॉलिसीधारकांना मोठा फटका बसला आहे,
अदानी-मोदी कनेक्शन मधून झालेल्या व्यवहारांचाच हा फटका सामान्य माणसाला बसला आहे असे रमेश यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर एका मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट टॅग केला आहे. ज्यात दावा केला होता की एलआयसीच्याच्या शेअरने 1.9 लाख कोटी रुपयांची नासाडी केली आहे.
अदानी समूहातील एलआयसीच्या होल्डिंग्सचे मूल्य घसरणीमुळे कॉंग्रेसने सरकारवर हा हल्ला केला आहे. एलआयसी ही भारताच्या आर्थिक व्यवस्थेचा महत्वाचा स्तंभ आहे, त्यांना अदानी समुहात धोकादायक गुंतवणूक करण्यास कोणी भाग पाडले असा सवाल रमेश यांनी केला आहे.