गणेश तलावातील समस्या तशीच : ठेकेदार पोसण्याचा घाट?
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राधिकरण, निगडी येथील गणेश तलावाचा गाळ पुन्हा काढण्यात येणार आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये या तलावातील गाळ काढण्यात येतो. यंदाही स्थापत्य विभागाच्या वतीने पुन्हा गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे दरवर्षीच लाखो रुपये खर्च करूनही समस्या तशीच असल्याने स्थापत्य विभाग ठेकेदार पोसण्यासाठीच निविदा राबविण्याचा घाट घालत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तलावात गाळ साचल्याने तसेच पाणी प्रदूषित झाल्याने तेथील माश्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. तलावातील गाळ काढण्यासाठी नागरिकांच्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे स्थापत्य विभागाने गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. या कामासाठी डी. जे एंटरप्रायजेस यांची 62 लाख 32 हजार 365 रुपये दराची निविदा प्राप्त झाली होती. ठेकेदारांने 42 लाख 44 हजार 453 रुपयांत काम करण्याचे मान्य केले. त्यानुसार स्थायी समितीमध्ये त्त्या विषयाला मान्यता देण्यात आली.
प्राधिकरण येथील गणेश तलावामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गाळ साचतो. त्यासाठी महापालिकेकडून दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र तरीही ही समस्या जैसे थे होते. ठेकेदार नक्की गाळ काढतो का? किती गाळ काढतो? हे पाहण्याची जास्त तसदी न घेता महापालिका प्रशासनाकडून गाळ काढण्याची निविदा मात्र काढली जाते. त्यामुळे ठेकेदाराला काम दिल्यानंतर तो ठेकेदार योग्य पद्धतीने काम करतोय का याची चौकशी महापालिका प्रशासनाकडून केली जात नसल्याचे समोर आले आहे. केवळ कागदोपत्रीच होत असलेल्या या कामामुळे गणेश तलाव परिसरातील समस्या तशीच आहे.