मंचर- पुणे जिल्ह्यातील काही खासगी दूध संघांनी थेट प्रति लिटर 10 ते 12 रुपयांनी दर खाली आणले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.दुधाचे दर कायम ठेवून संकटकालीन परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तसेच जिल्ह्यातील खासगी दूध व्यावसायिकांनी शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे, अशी मागणी आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली आहे.
करोना विषाणूच्या संकटामुळे दूध व्यवसायावर परिणाम झाला आहे. खासगी व सहकारी दूध संघांनी एकत्र येऊन दुधाचे दर 31 ते 32 रुपयांवरुन थेट 20 रुपयांपर्यंत खाली आणले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. ग्रामीण भागाचा दूध व्यवसाय हा आर्थिक कणा आहे. दुधाचे दर 10 ते 12 रुपयांनी खाली आल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. करोना विषाणूचे संकट अजून किती महिने राहील हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे दूध व्यवसायाची परिस्थिती अशीच राहिली तर दूध व्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडेल.
सध्या पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती व इतर खर्चामध्ये झालेली वाढ पाहता एक लिटरला 30 ते 32 रुपये उत्पादन खर्च येतो, असे असताना 20 रुपये दर शेतकऱ्यांना दिल्यास दूध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना नाईलाजास्तव जनावरे सांभाळावी लागतील. संकटकालीन परिस्थितीचा फायदा घेत खाजगी व सहकारी दूध संघांनी थेट वीस रुपयांपर्यंत दर केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खासगी व सहकारी दूध व्यावसायिकांना जर तोटा होत असेल. तर राज्य सरकारने थेट दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. संकटकालीन परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, खासगी व सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांची लूट थांबवुन पुर्वीप्रमाणे 30 ते 32 रुपये प्रतिलिटर दर शेतकर्यांना द्यावा.असेही प्रभाकर बांगर यांनी सांगितले.