राज्य सरकारचा कृती आराखडा चाप बसवणार?
पुणे – दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी व भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी कृती आराखडा तयार ककेला जाणार आहे. दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागांतर्गत असलेल्या प्रयोगशाळा व अन्न औषध प्रशासन विभागांतर्गत असणाऱ्या प्रयोगशाळा यांच्यातील विविध तपासण्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत हे निर्देश दिले आहेत.
राज्यात काही ठिकाणी भेसळयुक्त दूध आढळले असून, त्यामुळे बालकांवर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच भेसळयुक्त दूध ग्राहकांना विकले जात असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाच्या विक्रीवरही त्याचा दुष्परिणाम होतो. दूध भेसळ रोखल्यास शेतकऱ्यांचा दूध विक्री हा जोडधंदा किफायतशीर ठरणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दूध भेसळ हा विषय गांभीर्याने हाताळावा, याकरिता या बैठकीचे आयोजन केले होते.
या कृती आराखड्याअंतर्गत जिल्हास्तरीय तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग या तीनही विभागांच्या समन्वयाने एका पथकाची नियुक्ती करुन जकात नाका, चेक नाका, अशा विविध ठिकाणी धाडी टाकून पोलिसांच्या मदतीने भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार रोहित पवार, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त नरेंद्र पोयाम, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे, सहसचिव माणिक गुट्टे हे उपस्थित होते.