श्रीनगर – काश्मीरमध्ये बनावट चकमकीद्वारे तीन तरुणांच्या हत्येप्रकरणी एक लष्करी अधिकारी दोषी ठरला आहे. लष्कराने याप्रकरणाचा तपास केला असून तपासाअंती मेजर दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या चौकशीत आफ्स्पा कायद्यांतर्गत भारतीय सैन्याला असलेल्या विशेष अधिकाराचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे.
भारतीय सुरक्षा दलांनी 18 जुलै रोजी दावा केला होता की, दक्षिण काश्मीरमध्ये शोपियां जिल्ह्यात अश्मीपुरा गावात झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले होते. यानंतर सोशल मीडियातून माहिती समोर आली होती की, या चकमकीत मारले गेलेले तरुण हे प्रत्यक्षात जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील रहिवासी असून अश्मीपूरा गावात बेपत्ता झाले होते. या कारणांमुळे सुरक्षा रक्षकांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. यानंतर लष्कराने याप्रकरणाची चौकशी सुरु केली होती. त्यानंतर आता या चौकशीत मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याला तीन तरुणांच्या हत्येचा दोषी मानलं आहे. यांपैकी एक 16 वर्षीय तरुण होता.
यापूर्वी सप्टेंबरमध्ये सुरु झालेल्या या चौकशीत भारतीय सैन्याने प्राथमिक चौकशीतील पुराव्यांच्या आधारावर म्हटलं होतं की, सुरक्षा रक्षकांनी आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट या कायद्याची सीमा ओलांडली होती. सैन्याच्या चौकशीत समोर आलं की, सुरक्षा रक्षकांनी आफ्स्पा कायद्याच्या अधिकारांच्या बाहेर जात कारवाई केली. तसेच सुप्रीम कोर्टाने मंजूर केलेल्या चीफ ऑफ आर्मी स्टाफच्या निर्देशांचे उल्लंघन केले होते.
अश्मीपुरात चकमकीत मारल्या गेलेल्या तरुणांची नावं इम्तियाज अहमद, अबरार अहमद आणि मोहम्मद इबरार अशी होती. हे तिघेही जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात राहणारे मजूर होते आणि कामाच्या शोधात काश्मीरमध्ये गेले होते.