पाचगणी/महाबळेश्वर – पाचगणी जवळील गोडवलीमध्ये माय लेकींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह अल्याने महाबळेश्वर तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. गोडवली गाव सिल करून या दोघींच्या संपर्कात आलेल्या 45 लोकांना प्रशासनाने क्वारंटाइन केले आहे. दरम्यान महाबळेश्वर येथील नागरिक अजूनही करोनाला गांभिर्याने घेत नसल्याने प्रशासनाने सक्त कारवाईचा इशारा दिला आहे.
गोडवलीतील एक भाजी विक्रेता हा भाजी खरेदीसाठी वाईला वारंवार जात होता, चार दिवसांपूर्वी या भाजी विक्रेत्याचे निधन झाले. या भाजी विक्रेत्याच्या अंत्यविधीला मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. या भाजी विक्रेत्याचे नातेवाईक असलेल्या दोन महिलांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अंत्यविधीत सहभागी झालेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या अंत्यविधीत सहभागी होवून या दोन महिलांच्या संपर्कात आलेल्या लोकांपैकी 45 लोकांना प्रशासनाने क्वारंटाइन कक्षात भरती केले आहे. या सर्वांची टप्प्याटप्प्याने कोविड चाचणी घेण्यात येणार आहे. अंत्यविधी, लग्न अशा कार्यक्रमात सहभागी होवू नका, आजारी लोकांना प्रत्यक्ष भेटू नका, लोकांच्या दुखात अथवा सुखात सहभागी होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा, प्रत्यक्ष भेटून आपला आपल्या परिवारातील सदस्यांचा जीव धोक्यात घालू नका, अशा प्रकारचे आवाहन तहसीलदार सुषमा चौधरी पाटील, सातत्याने करीत आहेत.
परंतु, प्रशासनाने केलेल्या या आवाहनाला नागरिक प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत आहे. गोडवली येथील दोन महिला करोना रूग्णांमुळे महाबळेश्वर तालुक्यातील करोना रूग्णांची एकूण संख्या 36 झाली आहे. यापैकी माचुतर येथील एक व गोडवली येथील दोन असे एकूण तीन रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 36 रूग्णांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून 31 रूग्ण करोना मुक्त झाले आहेत.
महाबळेश्वरकर प्रशासनाने केलेल्या आवाहन अजून गांभिर्याने घेत नाही, आजही महाबळेश्वरच्या बाजार पेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. वाईन शॉपसह किराणा दुकान भाजी विक्रेत मेडिकल स्टोअर्स हॉटेल टपरी आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या तीन तेरा वाजल्याचे दिसून आले. बाजारातील गर्दीने महाबळेश्वरकरांना चांगलीच धडकी भरली आहे. गर्दी पांगविण्याचे प्रयत्न पालिकेचे कर्मचारी पोलीस कर्मचारी करीत होते. परंतु त्यांना कोणी दाद देत नव्हते, सर्वांचे आपले व्यवहार सुरळीत चालू होते. कोणीही सुरक्षित अंतर राखताना दिसत नव्हते, जर नागरिक ऐकत नाही तर मग पालिका व पोलीस प्रशासन सक्तीने कारवाई का करीत नाही असा प्रश्न महाबळेश्वर येथील नागरिक करीत आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पाचगणीतील व्यापारी, भाजीविक्रेते व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे अत्यावश्यक सेवेतील दूध आणि मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने 16 जुलै पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.