सांगवी – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पूरस्थितीमुळे गेल्या चार दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे नदीपात्रातील पाणी घरात शिरल्यामुळे राहण्याची तात्पुरती व्यवस्था शाळेत करण्यात आली. महापालिकेतर्फे या रहिवाशांना जेवण देण्यात आले. मात्र हे जेवण पूर्णपणे शिजलेले नव्हते. याशिवाय कच्चे दिल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला. चपाती आणि भाजी अर्धवट शिजवलेली असल्याने नागरिकांनी न खाता रोष व्यक्त केला.
धरणातून पाणी सोडल्यामुळे जुनी सांगवीत नदीपात्रा शेजारील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने येथील नागरिकांना तात्पुरता निवारा नृसिंह हायस्कूल प्राथमिक विद्यालय या शाळेत आश्रय दिला. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, छोटी मुले, गरोदर महिला, बाळंतीण अशा सर्व स्तरातील नागरिक आश्रयाला आले होते. या नागरिकांची महापालिकेने मंगळवारी रात्री जेवणाची व्यवस्था केली. मात्र जेवणासाठी देण्यात आलेली चपाती अर्धवटच भाजलेली होती, तर भाजीतील बटाटाही शिजलेला नव्हता; मात्र पर्याय नसल्याने नागरिक हेच जेवण खाणे पसंत केले. मात्र गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी हे जेवण घेण्यास नकार दिला.
दरम्यान, मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या उपाध्यक्षा नूतन शेळके यांना माहिती मिळाली. तसेच महापालिकेने दिलेले जेवण न खाण्याचे आवाहन केले. रहिवाशांना चांगल्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आवाहन केले. त्यावेळी या सामाजिक कार्यकर्त्यांनी तेथील नागरिकांना चांगले जेवण दिले. दरम्यान, महापालिकेच्या लोकांकडे कच्च्या जेवणाबाबत तक्रार करूनही महापालिकेच्या लोकांनी दुर्लक्ष करीत तेच जेवण नागरिकांना दिले.
यासंदर्भात नूतन शेळके म्हणाल्या की, पूरस्थितीचा सामना करणाऱ्या रहिवाशांना अर्धवट शिजलेले अन्न धोक्याचे आहे. गरोदर महिला, वयोवृद्ध तसेच बालकांचाही समावेश होता. त्यांना महापालिकेने जेवण दिले, ही चांगली गोष्ट आहे. मात्र अर्धवट शिजलेले जेवण नागरिकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला, ही गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. कारण अगोदरच वातावरण खराब आहे. त्यात असे जेवण ज्येष्ठ नागरिक, बालके आणि गरोदर महिलांना दिल्याने त्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याबाबत महापालिकेकडे तक्रार केली. मात्र नागरिकांचे म्हणणे ऐकूनच घेतले नाही. त्यामुळे महापालिकेने या नागरिकांना जेवन देण्याचा दिखाऊपणा करण्याची आवश्यकता नाही.