जम्मू – जम्मू काश्मीरातून 1990 च्या सुमाराला काश्मीर खोऱ्यातून जे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले त्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमुर्तींकडून चौकशी केली जावी अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी केली आहे.
या विषयीच्या एका वेबीनार मध्ये बोलताना त्यांनी म्हटले आहे की, पंडितांशिवाय काश्मीर खोरे अपुर्ण आहे. पंडितांना काश्मीर खोऱ्यात परत आणण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना आपली साथ राहींल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
1990 च्या सुरूवातीला काश्मीरातील गनिमी कारवायावाढल्यामुळे सुमारे 60 हजार काश्मीर पंडितांच्या कुटुंबांनी काश्मीरातून अन्यत्र स्थलांतर केले. या स्थलांतराला तत्कालिन राज्यपाल जगमोहन हे जबाबदार आहेत. तुम्हाला तीन महिन्यात परत आणतो असे खोटे आश्वासन देऊन त्यांनी पंडितांना येथून हलवले असा आरोपहीं त्यांनी केला.
याच प्रकाराची चौकशी होण्याची गरज आहे असे ते म्हणाले. काश्मीरातील मुस्लिमांनी पंडितांना तेथून हाकलून लावले हा आरोप खरा नाही. अजूनही काहीं काश्मीरी पंडित खोऱ्यात राहात आहेत असा दावा त्यांनी केला.
काश्मीर पंडित तेथे येऊन राहावेत अशी अजूनही मुस्लिमांची भावना आहे असे ते म्हणाले.
काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा येथील कोणाशीही चर्चा न करता दिल्लीतील राज्यकर्त्यांनी परस्पर रद्द केला आहे. पण त्यामुळे ना काश्मीरचा विकास झाला आहे ना येथील दहशतवाद संपला आहे असेहीं त्यांनी यावेळी नमूद केले.