शिर्डी -विधान परिषद निवडणुकीत मते फुटल्यावरून कॉंग्रेस कारवाई तरी कोणावर करणार, असा सवाल करतानाच तत्त्व आणि विचारांना तिलांजली देऊन सत्तेत सहभागी झाल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनीच माफी मागितली पाहिजे, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून मध्यावधी निवडणुकांची होत असलेली वक्तव्ये ही नैराश्येच्या भावनेतूनच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
आ. विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणारे सरकार हे विकासाचे आणि विचारांचे आहे. जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर आल्याने पुढील अडीच वर्षेच काय, तर पुढील अनेक वर्षे हे सरकार जनतेसाठी काम करून आघाडी सरकारच्या काळात अधोगतीला गेलेले राज्य प्रगतिपथावर आणण्यासाठी काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री आ. चव्हाण यांनी पक्षातील आमदारांवरच कारवाई करण्याच्या केलेल्या मागणीवर भाष्य करताना आ. विखे पाटील म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष आता कारवाई तरी कोणावर करणार? कारवाई करायला या पक्षात माणसे तरी किती शिल्लक राहिली आहेत, याकडे लक्ष वेधले. कार्यकर्त्यांचा विचार न करता सत्ता भोगल्याबद्दल चव्हाण यांनीच माफी मागण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचीही कॉंग्रेससारखीच परिस्थिती!
राज्यात शिवसेनेचीही कॉंग्रेसपेक्षा वेगळी परिस्थिती नाही. नेतृत्वावर विश्वास न राहिल्यानेच अनेकजण नेतृत्त्वापासून दूर चालले आहेत. 55 आमदारांपैकी 40 आमदार एकावेळी निघून जातात. 12 खासदारही त्याच विचारात आहेत, आणखी किती माणसे दूर जातील याचा अंदाज शिवसेनेच्या नेतृत्वाला आता राहिलेला नाही. सत्तेसाठी भरकटलेले जहाज यांचे होते. त्यामुळेच बेताल वक्तव्य करणारे प्रवक्ते आता पक्षात दिसतील, असा खोचक टोला आ. विखे पाटील यांनी लगावला.