सुपरस्टार ऑफ दि मिलेनियम म्हणजेच शतकाचा महानायक म्हणून पूर्वीच गौरव झालेले ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने या महानायकाचा महासन्मान झाला असेच म्हणावे लागते. अमिताभ यांचे मित्र आणि गीतकार जावेद अख्तर यांनी आपली प्रतिक्रिया देताना हा पुरस्कार थोडा उशिराच मिळाल्याचे सूचित केले असले तरी देशातील सर्वोच्च पुरस्काराने या महानायकाचा सन्मान झाला म्हणून बिग बीच्या कोट्यवधी चाहत्यांना किती आनंद झाला हे सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरून लक्षात येते. गेली सुमारे 50 वर्षे हिंदी चित्रपट रसिकांना आनंद देणारे अमिताभ बच्चन आता वयाची पंचाहत्तरी पार केल्यानंतरही पूर्वीच्याच उत्साहाने चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. या कालावधीत प्रेक्षकांच्या दोन पिढ्या आल्या आणि गेल्या; पण अमिताभ नावाची जादू कायम आहे. या कालावधीत कितीतरी तथाकथित सुपरस्टार आले आणि गेले; पण अमिताभ यांचे अढळस्थान कायम आहे. या वयातही हा माणूस सर्वांत जास्त जाहिराती करीत आहे आणि येत्या काळात त्यांचे अनेक चित्रपट येऊ घातले आहेत.
अमिताभ यांना समकालीन असलेल्या अनेक नायकांची आणि अभिनेत्यांची कारकीर्द संपत आली किंवा संपून गेली तरी बीग बी अजूनही पूर्वीइतकेच बिझी आहेत. आपल्या व्यवसायाबाबत असलेली तळमळ वक्तशीरपणा आणि समोरच्याला मोठेपणा देण्याचा दुर्मीळ गुण याच्या जोरावरच अमिताभ आजही या इंडस्ट्रीत टिकून आहेत. सत्तरच्या दशकात तत्कालीन युवा पिढीला वेड लावणारा हा अभिनेता आता त्या पिढीच्या पुढील पिढीच्याही मनात घर करून बसला आहे. खरेतर कारकिर्दीच्या प्रारंभीच अपयशाचे झटके बसल्यानंतर कोणीही हा व्यवसाय सोडून देऊन अन्य मार्ग पत्करला असता; पण दृढनिश्चय आणि समर्पणाच्या भावनेतून अमिताभ कार्यरत राहिले आणि यशस्वी झाले.
जंजीर चित्रपटाच्या यशानंतर वेगाने दौडू लागलेली त्यांची कारकीर्द अजूनही सुरू आहे. जंजीरनंतरच्या काळात एका वर्षात चार-चार, पाच-पाच सुपरहिट चित्रपट देण्याचा विक्रम बिग बींनी केला होता. अमिताभ यांना समकालीन असलेल्या जितेंद्र यांनी त्या काळात केलेली टिप्पणी लक्षवेधी आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले दहा नंबर काढायचे झाल्यास पहिल्या 10 नंबरवर अमिताभ बच्चन आहेत आणि आमचा नंबर त्यानंतर सुरू होतो, असे जितेंद्र म्हणाले होते. कोणी कल्पनाही केली नसेल एवढे प्रचंड यश अमिताभ यांना लाभले होते. सध्याच्या काळात शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने तीन दिवस चांगला व्यवसाय केला तरी तो चित्रपट सुपरहिट मानला जातो. अमिताभ यांचा एखादा चित्रपट फक्त 25 आठवडे चालला तर तो फ्लॉप मानला जायचा, हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे.
उत्तम उंची आणि चांगला आवाज असलेले अनेक अभिनेते आज आहेत पूर्वीही होते; पण त्याला समंजस अभिनयाची जोड मिळाली तरच यशस्वी होता येते हे अमिताभ यांनी दाखवून दिले. एखाद्या मसाला चित्रपटातील नायकाने ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या सर्व गोष्टी अमिताभ लीलया करतात. अमिताभ यांच्या पूर्वीच्या काळात चित्रपटाचा फॉर्म्युला ठरलेला असे आणि एखादा विनोदी अभिनेता हा त्याचा अविभाज्य भाग असे. कारण चित्रपटाच्या नायकाकडून विनोदी अभिनय अपेक्षित नव्हता; पण अमिताभ यांचा विनोदी अभिनयही लक्षात राहतो. अमर अकबर अँथनी, याराना, सत्ते पे सत्ता ही त्याची उदाहरणे आहेत. म्हणूनच अमिताभ यांनी विनोदी कलाकार संपवले असा आरोप त्यांच्यावर केला जातो.
संयत अभिनय असो किंवा आक्रमक अभिनय असो अमिताभ यांनी नेहमीच आपली छाप सोडली. जंजीरनंतरच्या काळात अस्वस्थ असणाऱ्या तरुणाईचा आवाज म्हणून अमिताभ अँग्री यंग मॅन स्वरूपात अवतरले आणि काही काळ याच इमेजमध्ये अडकले. त्याचा फटका त्यांना बसला आणि अनेक चित्रपट सुपर फ्लॉप झाले; पण अमिताभ यांच्या वैयक्तिक अभिनयावर कधीच टीका झाली नाही. याच काळात त्यांनी कभी कभी, सिलसिला, चुपके चुपके असे चित्रपटही दिले आणि ते यशस्वीही झाले. अमिताभ जे काही करतील ते लोकांना आवडायचा तो काळ होता. वयोमानाप्रमाणे नंतरच्या काळात अमिताभ यांनी आपल्या भूमिका बदलल्या. साधारणतः 2000च्या आसपास त्यांनी अपयशाची नीचांकी पातळी पाहिली होती; पण त्यातूनही सावरून ते उभे राहिले. खरे पाहता अमिताभ यांना आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धातच जास्त चांगल्या भूमिका मिळाल्या आणि त्यांच्या अभिनयाचे खरे दर्शन होऊ शकले.
ब्लॅक, बागबान, आँखे, पा, वजीर, पिंक, पिकू, बदला, कभी ख़ुशी कभी गम अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची रेंज दाखवून दिली. सोशल मीडियामध्ये संपूर्ण सक्रिय राहून आणि सरकारी उपक्रमांचे ब्रॅंड अँबेसेडर म्हणून काम करून चर्चेत राहण्याची किमयाही त्यांनी साधली आहे. भारत सरकारच्या पोलिओ हटाव मोहिमेला यश मिळाले, त्याला मोठा हातभार अमिताभ यांचा लागला होता हे वास्तव आहे. आता स्वच्छ भारत मोहिमेचा प्रचारही अमिताभ करताना दिसतात. जरी कोणत्याही वादात न पडण्याची दक्षता ते घेत असले तरी योग्य ठिकाणी व्यक्त होण्यातही ते मागे पडत नाहीत.
मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचे समर्थन हे त्याचे ताजे उदाहरण आहे. टीव्ही वाहिन्यांचे महत्त्व लक्षात आल्यानेच त्यांनी 20 वर्षांपूर्वीच “कौन बनेगा करोडपती’ या गेम शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. आज या शोच्या 11 व्या सिझनचे संचालन तेच करीत आहेत. याच शोच्या एका ताज्या भागात एका स्पर्धकाने अमिताभ यांना लवकरच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या भावनेचा नम्रपणे स्वीकार करताना अमिताभ यांनी कोट्यवधी चाहते हाच माझा खरा पुरस्कार आहे, असे म्हटले होते. ते योग्यच आहे कारण चाहत्यांचे इतके प्रेम कोणत्याही अभिनेत्याला मिळाले नाही. दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांच्या या लोकप्रियतेवर राजमान्यतेचे शिक्कामोर्तबही झाले आहे. या महानायकाकडून भविष्यात अजूनही काहीतरी जास्त चांगले बघायला मिळण्याची अपेक्षा या निमित्ताने करायला हरकत नाही.