राजगुरूनगर – पुणे जिल्हा (कात्रज) सहकारी दूध संघाच्या कारभारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही त्रास दिला जात आहे. संघाचे अध्यक्ष आणि काही संचालक मनमानी कारभार करून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करीत आहेत.
संघात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याची माहिती खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी रविवारी (दि. 12) पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताबात असलेल्या दूध संघावर घणाघात करून आमदार मोहिते यांनी एकप्रकारे राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा दूध संघाचे माजी संचालक व जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती अरुण चांभारे यांचा उमेदवारी अर्ज मागील निवडणुकीत बाद झाला होता. न्यायालयीन लढाई लढवून त्यांची अपात्रतता रद्द करण्यात आली आहे. तथापी संघाकडून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. चांभारे यांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय संघाचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला. गेली दोन वर्षांपासून चांभारे यांच्या विरोधात जाणीवपूर्वक मजकुर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
वास्तविक अरुण चांभारे यांचा काहीही संबंध नसताना त्यांच्यावर संघाकडून अन्याय व बदनामी केली जात आहे. या संस्थेच्या गैर कारभाराची चौकशी करण्याची मागणी यापूर्वी दुग्ध विकास मंत्री व राज्यातील विविध स्तरावरील अधिकाऱ्यांकडे केली. जिल्हा दूध संघावर प्रशासक नेमण्याची मागणी केली; मात्र टोलवाटोलवी झाली. आता सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी आपली मागणी असून तसा पत्रव्यवहार लवकरच करणार आहोत.
मलई खाणाऱ्या बोक्यांची येथे चलती
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना दुग्ध व्यवसाय पुरक ठरतो. मात्र गेली काही वर्षे त्यांच्या कष्टाची संघाकडून चेष्टा सुरू आहे. दुधात घट, फॅक्ट, स्निग्धता (snf) यामुळे संस्थांना दूध पगार देणे अवघड बनले आहे. गरीब कष्टकरी जनतेच्या जीवावर मलई खाणाऱ्या बोक्यांची येथे चलती आहे. त्यांची ही मलई आपण लवकरच बाहेर काढुन जनतेसमोर उघडे पाडू असे आमदार मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्हा दूध संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांची सत्ता असल्याचे मानले जाते; मात्र असे काहीच नसून राज्यात सत्ता असल्याने त्यांच्या नावाखाली येथील संचालक मंडळ दुसऱ्या पक्ष आणि नेत्यांच्या विचाराने कारभार करीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलेला अध्यक्ष होत नाही. तर मनमानी कारभार करण्यासाठी स्वतंत्र गट तयार करून साटेलोटे सुरू आहे. त्याद्वारे भ्रष्टाचार करून हे मंडळ मनमानी कारभार करीत आहे, असा आरोप मोहिते पाटील यांनी केला.