केवळ 20 टक्के क्षमतेने काम सुरु; ‘श्रमिक ट्रेन’ने कामगार पोहचले घरी
पिंपरी – चालु वर्षांत पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो धावेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मेट्रोच्या वतीने देखील पिंपरी-चिंचवड शहरात “प्रायोरिटी रुट’ निश्चित करण्यात आला होता. मेट्रो रुळावर चढविली देखील होती. “करोना’मुळे मेट्रोचे काम ठप्प झाले होते. ते आता परत सुरु झाले आहे, परंतु “मेट्रो’च्या कामाला लागलेला ब्रेक काही हटला नाही. सध्या उपलब्ध असलेल्या कामगारांच्या साहाय्याने “मेट्रो’ केवळ 20 टक्के क्षमतेने काम करत आहे.
“करोना’चा कहर सुरु होताच मेट्रोचे काम करत असलेल्या ठेकेदारांच्या कामगारांनी गावाकडची वाट धरण्यास सुरुवात केली. मेट्रोने लॉकडाऊनच्या काळात कामगारांची सर्व व्यवस्था केली. परंतु “श्रमिक ट्रेन’ सुरु होताच कामगारांनी आप-आपले गाव गाठले. याचा मोठा फटका “मेट्रो’ला बसला आहे. आता सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून केवळ 800 कामगार उरले आहेत. मेट्रोच्या सर्व मार्गिकांचे काम पाहता ही संख्या नगण्य आहे. सध्या काही ठिकाणी कामे होत असल्याची दिसून येत आहेत. परंतु प्रलंबित असलेली महत्त्वाची कामे मात्र रखडलेलीच आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात दापोडीच्या हॅरिस पुल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंत असे एकूण 7 किलोमीटर अंतराच्या मार्गास महामेट्रोने प्राधान्यक्रम दिला आहे. हे काम डिसेंबर 2019 अखेरीपर्यंत पूर्ण करून प्राधान्यमार्गावर मेट्रो संचलन केले जाणार असल्याचा दावा महामेट्रोकडून वारंवार केला जात होता. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस पिंपरीतल्या पिंपरीत मेट्रो चालवूनही दाखविली. परंतु मार्च 2020 च्या मध्यापर्यंत या मार्गावरील काम पूर्ण करण्यात मेट्रोला अपयश आले. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत मेट्रोचे एकही स्थानक तयार झाले नव्हते. त्यानंतर “लॉकडाऊन’ सुरु झाल्याने मेट्रोचे काम पूर्णपणे ठप्प झाले. आता “मेट्रो’ला काम करण्यास परवानगी मिळाली आहे. परंतु कामगारच नसल्याचे “मेट्रो’चे अगदी क्षुल्लक काम सुरु आहे.
पावसालाही सुरुवात झाली असल्याने पुढील काही महिने मेट्रोच्या कामाला वेग येण्याची शक्यता खूपच कमी आहे. लॉकडाऊन पूर्णपणे संपल्यानंतर किती दिवसांच्या कामाचे नुकसान झाले, याचा आढावा घेतला जाईल, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु सध्यातरी “मेट्रो’चे काम खूपच मंदावले असल्याचे दिसत आहे.
कसे पूर्ण होणार काम?
महामेट्रोने 30 मार्च रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली होती की वाघोली, येरवडा, डेक्कन महाविद्यालय, कासारवाडी, किवळे, भुगाव, पिंपळे गुरव, वनाझ डेपो आणि कृषी महाविद्यालय ग्राउंड या सर्व ठिकाणी एकूण दोन हजार मजूर राहत आहेत. मेट्रोकडून पुरविल्या जाणाऱ्या चांगल्या सोयीसुविधा आणि योग्य वैद्यकीय सुविधेमुळे हे कामगार शहरातच थांबले आहेत. परंतु श्रमिक ट्रेन सुरु होताच यापैकी बहुतेक कामगार निघून गेले. त्यातच आता मेट्रोच्या येरवडा येथील लेबर कॅम्पमधील काही मजुरांना “करोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आणि आता कामगारांमध्येही भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत “मेट्रो’च्या कामाचा वेग पूर्णपणे मंदावला आहे. येत्या काही दिवसांमध्ये पावसाळा सुरु होत असल्याने मेट्रोचे काम आणखी लांबणीवर पडणार हे निश्चित. यामुळे 2020च्या सुरुवातीला प्राधान्यमार्गावर मेट्रो सुरु करण्याचे प्रयत्न 2021 पर्यंतही पूर्ण होण्याची शक्यता मावळली आहे.