रोजच्या धावपळीमुळे आज प्रत्येकाच्या जीवनात ताण-तणाव वाढत आहे. विशेष करून शहरी भागात प्रत्येक जण मानसिक तणावाखाली जगत असून तो जणू जीवनाचा एक भाग बनला आहे. भारतात प्रत्येक पाच व्यक्तीपैंकी एक जण मानसिक ताणतणावाचा शिकार असल्याचे आकडेवारी सांगते. तणावातूनच हिंसाचार वा आत्महत्येसारखं पाऊल उचललं जातं. म्हणूनच मानसिक तणावाचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि तो दूर करण्यासाठी काय केले पाहिजे हे जाणून घेतले पाहिजे.
तणावाचा आरोग्यावर होणारा परिणाम
तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. थकवा वाटू लागतो. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम सुरू होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा येतो. संताप वाढतो. आरोग्य बिघडते. याशिवाय मानसिक आजारही घेरतात. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, ह्रदयासंबंधी लेख, लठ्ठपणा, एसिडीटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागतात.
तणाव वाढल्यास लोक मद्य, ड्रग्ज, धुम्रपान सेवन सुरू करतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटत असले तरी तणाव कायमस्वरूपी दूर होत नाही. शिवाय यामुळे आरोग्याच्या इतर समस्या सुरू होतात. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी जीवनपद्धती बदलण्याची गरज आहे.
तणावमुक्तीचे उपाय
- तणाव का निर्माण झाला ते जाणून घ्या. त्यानंतर त्यापासून मुक्ती कशी मिळवता येईल, याचा विचार करा.
- आपल्या क्षमतेनुसार काम करा. आपल्या ताकदीबाहेरचे काम करू नका. त्यामुळे उगाचाच न्यूनगंड निर्माण होऊन तणाव वाढतो.
- जास्त शत्रू निर्माण करू नका. जय-पराजयाच्या भावना फार तीव्र नकोत.
- सतत काम करणे टाळा. विश्रांतीही घ्या.
- आपल्या गरजा कमी करा.
- आकस्मिक घडणार्या घटनांकडे शांत चित्ताने पहा.
- आधी आपल्याला काय साध्य करायचे ते ठरवा. त्यानुसार ताण न घेता ते साध्य करण्याचा प्रयत्न करा.
- नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांना कायम दूर ठेवा.
- आपण सतत चिडत तर नाही ना? हे पहा. मग त्यानुसार तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
- आधी आपल्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये लक्षात घ्या. त्यानुसार तणाव कमी करा.
- आपल्या मनाला सल्ला द्या. समजवा. एखादी स्थिती तुमच्यामुळे उत्पन्न झाली की दुसर्यांमुळे ते नक्की करा. ती स्थिती तुमच्यामुळे निर्माण झाली असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी शांततापूर्वक विचार करा.
- दुसर्यांना एका विशिष्ट्य मर्यादेपर्यंत आपण बदलू शकतो. त्यानंतर नाही. त्यामुळे त्याच्या भावनांना समजून घ्या.
- पुढच्याच ठेच मागचा शहाणा. या म्हणीतून काही शिका. मागचे अनुभव पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरू शकतात.
- तणावासंदर्भात तुमचे जवळचे मित्र, नातेवाईक यांच्याशी चर्चा करा. चर्चेने तणाव हलका होतो.
- रासायनिकदृष्ट्यासुद्धा तणाव वाढतो. उदा. कॅफीन जास्त पोटात गेल्यास विशिष्ट्य हार्मोन्स वाढतात व तणावही वाढतो.
- नियमित व्यायाम, योग, फिरणे, पोहणे, नृत्य यामुळे शरीर सैलावते. तणाव कमी होतो.
- नियमित ध्यान व प्रार्थना केल्यास तणाव कमी होतो.
- दिवसभरात सतत काम न करतात थोडी विश्रांतीही घ्यावी. शांतपणे बसून दीर्घ श्वास घ्या व तो हळूहळू सोडा.
- आपली एक दिनचर्या बनवा. प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ठ वेळ द्या.