नको रे मना क्रोध हा खेदकारी
नको रे मना काम नाना विकारी
नको रे मना लोभ हा अंगिकारू
नको रे मना मत्सरू दंभभारू
मनाच्या या श्लोकात समर्थ रामदासांनी “नको रे मना’ असे मनाला किती वेळा बजावले आहे. पण या मनाला सतत असं “नको’ म्हणायला लावावं लागतं. खरंच हे मन म्हणजे नक्की काय आहे. ते दिसत नाही, तो काही आपल्या शरीराचा अवयव नाही. तरीदेखील मन हे असतंच. त्याला दुःख होते, आनंद होतो, वेदना होते, ते भरून येतं, त्या मनात काही राहत नाही. तर काही वेळा असेही होते, की काही गुपिते मनातल्या मनातच राहून जातात.
जे मन आपण सतत जपतो, ते आपल्या शरीरात वास्तव्य करत असतं. या मनाचं स्वास्थ्य जपायचं, म्हणजे आपणच आपल्याला बजावायचं असतं, धावपळीच्या आणि प्रचंड वेगाच्या या काळात आपल्या मनाला जपायचं. म्हणजेच आपलं मनःस्वास्थ्य राखायचं.
माणूस जन्माला येतानाच आपल्या बरोबर बरीचशी नाती घेऊन येतो. ही नाती पुढे आयुष्यात सांभाळत असताना त्याला असंख्य तडजोडी, मान-अपमान सहन करावे लागतात. पण नाती जपताना “अहंकार’ बाजूला ठेवला, तर ती नाती दृढ राहतात. मात्र आजकालच्या या धावपळीच्या काळात नात्यांचे दृढपण हरवत चालले आहे. आपल्या या नात्यांची वीण सैल होत चालली आहे. आजच्या या धावपळीच्या जमान्यात “मला काय मिळेल?’ यासाठी प्रत्येकजण धावपळ करत आहे. धडपडत आहे. त्याला इतरांचे तर दूरच, पण स्वत:चेही मोल राहिलेले नाही. चाललेल्या या अविरत धावपळीत तो खूप काही गमावतोय.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची एक छान कविता आहे. कणा. या कणा शीर्षकाच्या कवितेत- “पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा’ अशी मागणी त्यांचा विद्यार्थी करतो. त्याला इतर काहीही मदत नको असते. ” पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा’ असे म्हणणारा विद्यार्थी आपण व्हायला हवं आहे. पाठीवर हात ठेवणारा असा आश्वासक आणि प्रेमाचा हात प्रत्येकालाच हवा असतो. यासाठी आपले जिवाभावाचे आप्त आपण जपायला हवेत. मनःस्वास्थ्य बिघडण्यसाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील पुरे होतात. तसे न करता थोडसं दुर्लक्ष करून किंवा तो त्या व्यक्तीचा स्वभाव आहे असे मसजून, आपण आपल्या पुरते आपले मनःस्वास्थ्य जपावे.
खरं पाहिलं तर माणूस आपल्याकडे काय आहे, हे पाहण्यापेक्षा यापेक्षा दुसऱ्याकडे काय आहे, याचा विचार अधिक करतो. त्यामुळेच त्याला खिन्नता येते. जे आपल्याकडे आहे, ते आपले आहे. ही भावना धरून जर आपण समाधानात राहिलो, तर दुसऱ्याच्या आनंदात सहजपणे सहभागी होता येते व आपले मनःस्वास्थ्य बिघडत नाही.
कोणाचेही मनःस्वास्थ्य टिकविण्यासाठी संगीत आणि वाचन हे दोन अगदी साधे आणि सहजसाध्य उपाय आहेत. या खेरीज एखादा छंद लावून घेतला, तर त्या छंदात देखील मन चांगले रमून जाते. याखेरीज योगाभ्यास, ध्यानधारणा, सहलींना जाणे असेही बरेच पर्याय आजच्या काळात सर्वत्र सहज उपलब्ध आहेत आणि ते सोयीचेही आहेत. त्यांचा उपयोग करून घ्यायला हवा. लहान मुलांसारखं निष्पाप आणि निरागस मन जपायला हवं. कधी कधी मन निरुत्साही होते, मरगळ येते, उदासपणा जाणवतो हे खरं आहे, पण अशा वेळी सरळ आपल्याला आवडणारी गोष्ट करावी. म्हणजे अगदी एखादा सिनेमा बघावा, फिरायला जावे, गाणी गावीत किंवा स्वस्थ बसून राहावे.
शेवटी मनाचं स्वास्थ्य मनावरच अवलंबून आहे आणि ज्याचं त्याचं, ज्यांनी त्यांनी ते स्वतःसाठीच जपायचं आहे. कारण मनःस्वास्थ्यावर आपलं शरीरस्वास्थ्य अवलंबून आहे. करुणाष्टकामध्ये अचपळ मन माझे नावरे आवरीता असे मनाचे वर्णन केले आहे. आपले मन खरोखरच चंचल आहे. आणि ते अचपळ, चंचल असलेले मन स्थिर आणि आनंदी ठेवणे हे आजच्या धावपळीच्या काळात कठीण जरी असले, तरी अशक्य नक्कीच नाही. तेव्हा मनःस्वास्थ्य जपणे ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
– आरती मोने