नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या जागतिक उच्च रक्तदाब दिनाचे औचित्य साधून केलेल्या एका अभ्यासातील निष्कर्षानुसार 25 ते 35 वर्षे वयोगटातील 10 ते 12 टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे.
विशेषत: पुण्याच्या बाबतीत हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यासाठी तणाव व आजारांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष हे कारण असल्याचे दिसून आले आहे. या अभ्यासासाठी जानेवारी 2015 ते एप्रिल 2016 या कालावधीमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या करुन घेतलेल्या 23,145 लोकांच्या आरोग्यविषयक अहवालांचा वापर करून घेण्यात आला.
अहवालाने निदर्शनास आणले आहे की, पुणेकरांमध्ये स्थूलपणा, मधुमेह व हृदयविकार यांसारखे जीवनशैली आजारांचे प्रमाण जलदगतीने वाढत असून पुण्यातील श्रमजीवी लोकांमध्ये तणावरहित उच्च रक्तदाबाचे प्रमाण 4 टक्क्यांनी वाढले आहे.
यासंदर्भात इंडस हेल्थ प्लसचे डॉ. अमोल नायकवडी यांच्या म्हणण्यानुसार, पुण्यामधील स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये (35 ते 40 वर्षे) उच्च रक्बदाबाचे प्रमाण अधिक आहे. हा आजार फक्त वृद्ध वयोगटातील व्यक्तींना नसून, 20 वर्षे वयोगटातील युवांमध्येसुद्धा हा आजार आढळून आला आहे.
बैठी जीवनशैली, शारीरिक व्यायामाचा अभाव अशा कारणांमुळे लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे. जर योग्य वेळेवर उपचार घेतला नाही, तर हृदयविषयक आजार, मूत्रपिंड व इतर अवयव निकामी होणे असे आजार होऊ शकतात. वेळेवर व नियमित तपासणी उच्च रक्तदाबाचा धोका कमी करु शकते.