सातारा – जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात मनमानी कारभार सुरु असून सदस्यांनी सुचवलेली कामेही होत नाहीत. निधी असूनही थातूर मातूर उत्तरे सांगून दिशाभूल करण्याचे प्रकार होत आहेत. या सर्व प्रकाराला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे जबाबदार आहेत. काही अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असून पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनाही विश्वासात घेतले जात नाही. सदस्यांच्या भावना तीव्र असून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी याबाबत सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, असे आदेश अध्यक्ष उदय कबुले यांनी दिले. दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार कोपर्डे हवेली प्राथमिक आरोग्य केंद्राचा ठराव मांडण्यात आला. मात्र, भाजपचे सदस्य सागर शिवदास यांच्या आक्रमकतेनंतर हा ठराव स्थगित ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सभापती मानसिंगराव जगदाळे, मंगेश धुमाळ, सौ. सोनाली पोळ, सौ. कल्पना खाडे, माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, पक्षप्रतोद सुरेंद्र गुदगे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे आदी यावेळी उपस्थित होते. सभेत बांधकाम, शिक्षण, सामान्य प्रशासन विभागाला सदस्यांनी टार्गेट केले. संतोष धोत्रे यांच्या कारभाराबाबत धैर्यशील अनपट म्हणाले, “नियोजन समितीमार्फत होणाऱ्या कामांबाबत धोत्रे यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला. प्रत्येक वेळी चुकीची माहिती देण्यात आली. अन्य जिल्ह्यात नियोजन समित्यांच्या निधीतून कामे झाली.
मात्र, सातारा जिल्ह्यात करोनाचे कारण सांगून कामे केली नाहीत. अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून त्रास दिला जात आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानीच्या तक्रारी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडेही गेल्या आहेत. मग हे त्यांच्यापेक्षा मोठे आहेत का, कामांना कोलदांडा देऊन चुकीच्या पध्दतीने कारभार होत आहे.’ कोणा अधिकाऱ्यांमुळे जिल्हा परिषदेची बदनामी होत असेल तर गंभीर आहे, असे सुरेंद्र गुदगे यांनी सांगितले. या विषयावर दीपक पवार, अर्चना देशमुख, मनोज पवार, सागर शिवदास, अभय तावरे, ऍड. उदयसिंह पाटील आदी सदस्यांनी चर्चा केली.
सागर शिवदास यांचा विष घेण्याचा इशारा
सैदापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे असा 2017 चा ठराव आहे. बृहत आराखड्यात सैदापूरचा समावेश आहे. मात्र, कोपर्डे हवेलीचा बृहत आराखड्यात समावेश नसतानाही याठिकाणी आरोग्य केंद्राचा घाट कशासाठी, असा प्रश्न सदस्य सागर शिवदास यांनी आक्रमकपणे मांडला. कोणाच्या तरी सांगण्यावरुन आमच्यावर अन्याय होणार असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. सैदापूरला डावलायचे असेल तर सैदापूर आणि बनवडी ही दोन गावे वगळून दुसऱ्या लोकसंख्येचा समावेश कोपर्डे हवेली आरोग्य केंद्रासाठी करण्यात यावा. याबाबत अन्याय झाल्यास विषाची बाटली घेण्याचा इशाराच शिवदास यांनी दिल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली. शिवदास यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर हा विषय स्थगित ठेवण्यात आला.