मुंबई: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दणका मिळाला आहे. घोटाळ्यानंतर परदेशात पसार झाल्याने त्याला परागंदा आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी सक्तवसुली संचालनालया कडून (इडी) विशेष पीएमएलए न्यायालयात कारवाई सुरु आहे. या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती आरोपी कडून करण्यात आली होती. परंतु बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
उच्च न्यायालयाने हि याचिका फेटाळल्याने इडीच्या अर्जावर निर्णय देण्यास विशेष न्यायालयाला मार्ग मोकळा झाला आहे. ‘विशेष पीएमएलए न्यायालयाने वारंवार समन्स व वॉरंट बजावूनही चोक्सी न्यायालयासमोर हजर झालेला नाही. म्हणून त्याला परागंदा घोषित करण्यासाठी इडीने अर्ज केला असल्याचे’ ईडीच्या वकिलांकडून सांगण्यात आले आहे.
तर ‘इडीच्या अधिकाऱ्यांनी केवळ प्रतिज्ञापत्रावर दिलेल्या माहिती व तपशीलाच्या आधारे कनिष्ठ न्यायालय निर्णय देऊ शकत नाही. जे निष्कर्ष व माहितीच्या आधारे इडीने अर्ज केला आहे त्याबद्दल इडीच्या संबंधित अधिकाऱ्यांची उलटतपासणी करण्याची किंवा स्वत:चे साक्षीदार उभे करण्याची संधी आरोपीला मिळायला हवी. त्यामुळे ज्या पद्धतीने पीएमएलए न्यायालयात याविषयीची प्रक्रिया सुरू आहे ती चुकीची आहे’, असा दावा चोक्सीच्या वकिलांनी केला होता.
त्यानंतर ही कायदेशीर कार्यवाही थांबवणे योग्य होणार नाही, असे निरीक्षण नोंदवून खंडपीठाने चोक्सीचा अर्ज फेटाळत असल्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला आहे.