श्रीनगर : पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची नजर कैदेतून मुक्तता होताच त्यांनी कलम ३७० परत मिळवण्याची हाक काश्मिरी जनतेला दिली होती. तर त्यांनी पुन्हा एकदा शुक्रवारी वादग्रस्त विधान केले.
शुक्रवारी मेहबूबा मुफ्ती यांनी श्रीनगर येथे पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा देश, दोन ध्वजांचे राजकारण पुढे केले. सुरुवातीला मेहबुबा म्हणाल्या की, आम्ही कलम ३७० पुन्हा आणणारच आणि असे होईपर्यंत मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. यासोबतच मेहबुबा यांनी भारताच्या राष्ट्रीय ध्वजाबद्दल अपमानास्पद भाष्य केले.
त्या पुढे म्हणाल्या, आम्हाला आमचा जम्मू-काश्मीर ध्वज परत मिळेपर्यंत तिरंगा ध्वज हाती धरणार नाही.
मेहबुबा यांच्या विधानावर संतप्त झालेल्या सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदल यांनी मेहबुबा यांच्याविरूद्ध राष्ट्रीय सन्मान कायद्यासह कलम १२१, १५१ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तत्पूर्वी, कैदेतून मुक्तता झाल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता.५ ऑगस्ट २०१९ या काळ्या दिवशी घेण्यात आलेला निर्णय माझ्या ह्रदयावर घाव घालत राहिला. मला विश्वास आहे की, अशीच परिस्थिती जम्मू काश्मीरमधील लोकांची असेल. जनता तो विसरणार नाही. आता आपल्याला निर्धार करावा लागेल की, ५ ऑगस्ट रोजी दिल्लीनं बेकायदेशीरपणे जे हिसकावून घेतलं, ते परत घ्यावं लागेल. असा इशारा मुफ्ती यांनी मोदी सरकारला दिला होता.
दरम्यान, मेहबुबा मुफ्ती यांना ऑगस्ट २०१९ पासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ५ ऑगस्ट २०१९ रोजी सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० च्या तरतुदी रद्द केल्या. यावेळी सरकारने सर्व नेत्यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, फारूक अब्दुल्ला आणि इतर अनेक राजकारण्यांचा सहभाग होता. अलीकडेच अन्य नेत्यांनाही कोठडीतून मुक्त करण्यात आले होते, ज्यात फारूक अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता.