श्रीनगर -जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची सोमवारी पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली. ती फेरनिवड तीन वर्षांच्या कालावधीसाठी आहे.
जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पीडीपीची स्थापना झाली. ते कार्य पक्ष यापुढेही करत राहील, असे मेहबुबा फेरनिवडीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा केव्हा मिळणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्या उत्तरल्या, तो निर्णय मी घेऊ शकत नाही. ते पाऊल केंद्र सरकारने उचलायचे आहे. जनतेच्या हक्कांसाठी आम्ही लढतच राहू. त्यासाठी पोलिसांना मला अटक करायची असेल तर करूद्या. ते त्यांचे कर्तव्य पार पाडतील. मी माझे कार्य करत राहीन, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
मेहबुबा यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत मुफ्ती मोहम्मद सईद यांनी 1998 मध्ये पीडीपीची स्थापना केली. नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचा प्रादेशिक पर्याय म्हणून तो पक्ष उभा राहिला. मागील दोन दशकांत जम्मू-काश्मीरमधील महत्वाचा पक्ष बनण्यात पीडीपीला यश आले. मात्र, भाजपशी युती करून जम्मू-काश्मीरात स्थापन केलेले सरकार जून 2018 मध्ये कोसळल्यानंतर पीडीपीला गळती लागली. पीडीपीच्या काही महत्वाच्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला.