नवी दिल्ली – केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. त्यांनी तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली असून ते कायदे रद्द केले नाहीत तर भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येणार नाही असे विधान मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहे. मलिक हे सातत्याने भाजपला घरचा आहेर देणारी विधाने करीत असून त्यांनी पहिल्यापासूनच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दिला आहे.
राजस्थानात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की केंद्र सरकारच्या ताठर भूमिकेमुळे शेतकरी इतका आक्रमक झाला आहे, की त्यांच्यामुळे उत्तरप्रदेशातील अनेक गावांमध्ये भाजप नेत्यांना प्रवेशही करता येईनासा झाला आहे. मी स्वता मेरठचा रहिवासी असून आमच्या जिल्ह्यातील कोणत्याही गावात कोणताही भाजप नेता प्रवेश करू शकत नाही अशी स्थिती आहे.
मुज्जफरनगर आणि बागपत जिल्ह्यातहीू अशीच स्थिती आहे असे त्यांनी नमूद केले. लखीमपुरच्या घटनेच्या संबंधात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की ज्या दिवशी तेथे शेतकऱ्यांना चिरडून ठार मारण्याची घटना घडली त्याच दिवशी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यायला हवा होता, खरे म्हणजे अजय मिश्रा हे मंत्री होण्याच्याच लायकीचे नाहीत अशी टिपण्णीही त्यांनी केली.
ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि त्यांच्या आंदोलनावर अमित शहा, मोदींसह अनेक भाजप नेत्यांशी भांडलो आहे. तुम्ही चुकीचे वागत आहात असेही त्यांना सांगून झाले आहे असेही मलिक यांनी पत्रकारांना सांगितले. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आपण आवाज उठवतच राहणार त्यासाठी आपल्याला राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा लागला तरी आपली त्यासाठी तयारी आहे असेही मलिक यांनी स्पष्ट केले आहे.