उत्तम पिंगळे
अप्पासाहेब विरोधी पक्षातील आमदार असले म्हणून काय झालं आमदारच ते. कार्यकर्त्यांना एकसंध ठेवण्याकरता त्यांनी 31 जुलैला स्नेहभोजन ठेवले होते. बाजूच्या मतदारसंघातील त्यांच्याच पक्षाचे आमदार पक्ष सोडून गेल्याने त्यांच्यावरही वरिष्ठांची नजर होतीच. कार्यकर्त्यांच्या स्नेहभोजनाला म्हणावा तसा उत्साह नव्हता. कारण कित्येक कार्यकर्ते शेजारच्या आमदारांच्या पक्ष प्रवेशानंतरच्या स्नेहभोजनाला गेले होते. जेवणावळ उरकून रात्री एकच्या सुमारास अप्पासाहेब घरी पोहोचले, काहीही न बोलता थेट बिछान्यावर पडून गेले.
बिछान्यावर पडून देखील त्यांचा डोळा लागेना.विचार करू लागले की आपण काय करावे? त्यात त्यांचा कधी डोळा लागला ते समजलेच नाही. डाराडूर झोपेत ते भविष्यात चालू लागले. त्यांना दिसले की विधानसभा निवडणुका घोषित झालेल्या आहेत. त्यांना तिकीट नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. कारण कित्येक जण मेगाभरतीमध्ये पक्ष सोडून गेले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षाने त्यांचे तिकीट निश्चित केले पण दुसऱ्या ठिकाणी अनेक नवख्या लोकांना तिकीट दिले.
निवडणूक अर्ज भरतानादेखील कार्यकर्त्यांची गर्दी तुरळकच होती. मनात एकदम धस्स होत होते. काही कार्यकर्ते खासगी व घरगुती कामात गुंतले आहेत. तर काही आजारी आहेत असे निरोप येत होते. अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तयारी करण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवशी त्यांना समजले की, त्यांच्या बाजूच्या मतदारसंघातील मेगाभरतीत गेलेले आमदार त्यांच्या विरोधात सत्ताधारी गटातून उभे आहेत. त्यांनी त्यांचा मतदारसंघ सोडला कसा? मग समजले की त्यांना केवळ आपल्याला पाडण्याकरता उभे केले गेले आहे. मागील निवडणुकीत बाजूचे आमदार जेमतेम निवडून आले होते म्हणजे सत्ताधारी व विरोधकांची मते तेथे जवळपास सारखी होती. म्हणून तेथील सत्ताधाऱ्यांच्या पडलेल्या उमेदवारास पुन्हा उमेदवारी दिली गेली म्हणजे त्याचे यावेळी निवडून येणे सोपे होईल.
अप्पासाहेबांना दरदरून घाम फुटला कारण आपलाच मित्र पक्ष सोडून गेल्यावर आपल्याच मतदारसंघात आपल्याविरुद्ध उभा ठाकला आहे. पण करणार काय, आता लढण्याची तयारी सुरू केली. एके काळचे जीवश्चकंठश्च मित्र व सरकारच्या विरोधातले खंदे कार्यकर्ते आता आपापसात बिलकूल बोलत नव्हते. निवडणुकीच्या दिवशी तर विचारूच नका. अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झाले. दोन दिवसांनी मतमोजणी होती. एक्झिट पोलही अप्पासाहेबांचा पराभव सांगत होता.
शेवटी मतमोजणीचा दिवस उजाडला व अकरा वाजण्याच्या सुमारासच आप्पासाहेबांचा खेळ संपला. साठ हजार मतांनी पराभव झाला. विजयी कोण? तर आपलाच पूर्वीचा मित्र पण सत्ताधाऱ्यांकडून. पलीकडील मतदारसंघही सत्ताधाऱ्यांनाच गेला. आता आपले कसे होणार हा विचार करत मतमोजणी केंद्राकडून घराकडे निघाले. गाडी स्वत: चालवत होते व तंद्रीत असताना स्पीडब्रेकरवरून गाडी जरा जोरातच उडाली. त्या झटक्यात अप्पासाहेबांना जाग आली. त्यांनी काही क्षण आजूबाजूला पाहिले मग समजले की एवढा वेळ पाहात होतो ते स्वप्नच होते. रात्रीचे तीन वाजले होते व मोबाइलही आजची 3 ऑगस्ट तारीख दाखवत होता. म्हणजे निवडणूक अजून घोषित व्हायची आहे. मेगाभरतीही चालू आहे काय करावे “टू बी ऑर नॉट टू बी’ हा अनुत्तरित प्रश्न त्यांनाही भेडसावू लागला.