महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा त्यापूर्वीही इतर राजकीय पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना भाजपमध्ये घेण्याच्या भूमिकेवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने भाजपच्या या धोरणाविषयी शंका निर्माण होत आहे. इतर राजकीय पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये आल्यामुळे भाजपाच्या मूळ संस्कृतीला धोका निर्माण झाल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या मतावर टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी सारवासारव करून या विधानाविषयी खुलासा केला असला तरी भाजप नेत्यांच्या मनात काय आहे, हे स्पष्ट झाले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमधील मेगा भरती ही मेगा चूक असल्याचे लवकरच भाजपच्या लक्षात येत असल्याचे म्हटले आहे. अर्थात, या वादामध्ये एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे आपला पक्ष सोडून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांच्या मनस्थितीचा विचार भाजपने केला आहे का? भाजपमध्ये मेगाभरती करून चूक झाली, असे चंद्रकांत पाटील म्हणत असतील तर आपला पक्ष सोडून भाजपमध्ये आलेल्या या नेत्यांना भाजपमध्ये आपल्याला भवितव्य नाही, असे वाटल्यास आश्चर्य वाटायला नको. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्ताधीश झाल्यानंतर गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये इतर राजकीय पक्षातील असंतुष्ट नेते भाजपमध्ये येण्याचे प्रमाण खूपच वाढले होते.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजप पुन्हा सत्तेवर येणार या शक्यतेने अनेक महत्त्वाचे नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले होते. त्यांच्यापैकी काही नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला तरी काही नेते निवडून आले असले तरी राज्यात भाजपचे सरकार स्थापन न झाल्याने मंत्रिपद मिळवण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे ठरले आहे, अशी परिस्थिती असतानाच चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या संस्कृतीविषयी विधान करून या नेत्यांच्या मनात अधिकच संशय निर्माण केला आहे. भाजप हा कोणत्या घराण्याचा किंवा विशिष्ट नेत्याचा पक्ष नसल्याने भाजपची संस्कृती वेगळी आहे तर इतर पक्षांमधून भाजपमध्ये आलेले नेते विशिष्ट घराण्याशी संबंधित असल्याने त्यांची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे त्यांना भाजपच्या संस्कृतीशी जुळवून घेण्यात वेळ लागेल, असे चंद्रकांत पाटील यांना म्हणायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे; पण मुळात हा विषय काढायचे कारण होते का याचा विचार पक्षनेतृत्वाने करण्याची गरज आहे.
इतर पक्षांमधील भाजपमध्ये आलेले नेते सध्या पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये मनापासून सहभागी होताना दिसत नाहीत. पक्षाने केलेल्या आंदोलनात किंवा पक्षाचे स्थानिक कार्यक्रम या ठिकाणी हे नेते औपचार म्हणून उपस्थित राहतात किंवा सरळ अनुपस्थित राहतात. सर्वात जास्त जागा मिळूनही भाजप सरकार स्थापन करण्यात असमर्थ ठरल्याने या नेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे, असे असताना त्यांना समजून घेण्याऐवजी त्यांच्या पक्षातील आगमनाबाबत शंका उपस्थित करणे चुकीचे ठरणार आहे. प्रदेशाध्यक्ष पदावरील व्यक्तीने असे विधान केल्याने हे पक्षाचे अधिकृत धोरण आहे काय, असा प्रश्न आता विचारला जाऊ शकतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या सर्वच पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काही नेत्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यापैकी अब्दुल सत्तार सारख्या नेत्यांना आता मंत्रिपदाची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे भाजपमध्ये आलेल्या इतर नेत्यांमध्ये नाराजी वाढली नसल्यास नवलच. खरे तर सध्या विरोधी बाकांवर विरोधी पक्षाचे काम करीत असताना भाजपला आपल्या सर्व आमदारांशी जुळवून घेण्याचे काम करावे लागणार आहे.
विशेषतः इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या आमदारांना दिलासा देण्याचे काम करावे लागेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार फार काळ टिकणार नाही आणि पुन्हा एकदा भाजपला संधी उपलब्ध होईल अशी भावना किमान या आमदारांच्या मनात जिवंत ठेवण्याचे काम पक्षाला करावे लागणार आहे. पण तसे न करता उलट या आमदारांना निरुत्साही आणि नाराज करण्याचे काम जर पक्ष नेतृत्वाकडून होत असेल तर पक्षाच्या धोरणात कुठेतरी चूक होत आहे असेच म्हणावे लागेल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये भरती झालेल्या काही नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यांची अवस्था तर “ना घर का ना घाट का’, अशी झालेली आहे.
अशा नेत्यांना दिलासा देण्याचे कामही भाजपला करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत पक्षाच्या नेत्यांनी थोडी सावधगिरीची भूमिका घेण्याची गरज आहे. आपण काय बोलतो आणि आपण काय करतोय याची त्यांनी काळजी घ्यायला हवी. निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये झालेली मेगा भरती ही पक्षाची मेगा चूक असेल असे विधान अशोक चव्हाण यांनी केले आहे ते या ठिकाणी महत्त्वाचे आहे. कारण भाजपमध्ये गेलेले हे नेते पुन्हा कधीही स्वगृही परतू शकतात याची जाणीव भाजपला असायला हवी. हातात सत्ता नसतानाच नेते आणि कार्यकर्ते यांना सांभाळण्याचे खरे कौशल्य असते जे आता भाजप नेतृत्वाने दाखवण्याची गरज आहे; पण मेगा भरतीमध्ये भाजपच्या संस्कृतीला धक्का पोहोचल्याचे चंद्रकांत पाटलांचे मत या कौशल्याचा भाग असू शकत नाही. सध्या विधानसभेतील सत्ता भाजपकडे नसली तरी आगामी काळात काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत.
या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाला या नेत्यांची मदत आणि गरज भासणार आहे. त्यामुळे हे नेते नाराज होणार नाहीत याची काळजी पक्षाला घ्यावीच लागेल. आपण भाजपमध्ये गेलो हीच आपली चूक झाली, असे या नेत्यांना वाटले आणि त्यांनी दुसरा कोणता विचार सुरू केला तर तो भाजपसाठी मोठा धक्का असेल म्हणूनच आगामी कालावधीमध्ये भाजपच्या नेत्यांनी बोलताना थोडा विचार करण्याची गरज आहे. भाजपच्या संस्कृतीमध्ये वाढलेले नेते आणि कार्यकर्त्यांना सांभाळतानाच इतर पक्षांमधून भाजपमध्ये आलेले नेते आणि कार्यकर्ते यांनाही सांभाळण्याची गरज पक्षाने लक्षात घ्यायला हवी.