बारामती – महत्त्वाकांक्षी मुंबई-हैदराबाद हायहस्पीड रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सध्या सुरु आहे. मार्गावर महाराष्ट्रातील ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद अशी दहा स्थानके होणार असल्याची माहिती दिली.
ही रेल्वे पूर्णपणे पूल व बोगद्यांद्वारे मार्गक्रमण करणार असल्याने पूल उभारणी व रेल्वे स्थानकांच्या उभारणीच्याच जागांचेच अधिग्रहण होणार असल्याचे स्पष्ट झाले. आगामी चार महिन्यांत सर्वेक्षण अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केले जाईल. रेल्वेकडून त्याला हिरवा कंदील मिळाल्यानंतरच भूसंपादनाच्या कामास प्रारंभ होणार आहे.
प्रकल्पाच्या पर्यावरण व सामाजिक विचारांसाठी सार्वजनिक सल्लामसलत बैठक (दि.22) बारामतीत पार पडली. बैठकीत ज्या परिसरातून व ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्याची शक्यता आहे, अशा कोणालाच बैठकीची माहितीच दिली नसल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांनी केला. दरम्यान, नुकसानभरपाईबाबत प्रदीप शिंदे व नीलेश टिळेकर यांनी विचारणा केली.
बैठकीस उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, यांच्यासह अनिल शर्मा, सत्यव्रत पांडे, शाम चौगुले उपस्थित होते. प्रकल्पात पुणे जिल्ह्यातील मावळ, खेड, हवेली, पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यातील 90 गावांतील 360 हेक्टर जमिनीचे यात भूसंपादन होणार आहे. मात्र, नेमके कोणते गटक्रमांक बाधित होणार आहेत, हे अद्याप निश्चित झालेले नाही. पुण्यात मांजरी परिसरात तर बारामतीत गाडीखेल कटफळ परिसरात रेल्वे स्थानक होणार आहे, अशी माहिती देण्यात आली. मालकांच्या संमतीने तसेच महाराष्ट्र जमीन दुरुस्ती कायदा 2018 नुसार जमीन खरेदी केली जाणार आहे.
नुकसानभरपाईचा आवाका दृष्टीपथात
शहरी भागातील बाजारभावाच्या अडीच तर ग्रामीण भागात पाचपट नुकसानभरपाई
जमीन मालकांकडून जागेचे दर व मूल्य यावर सहमती घेतली जाणार
सर्व संरचनेचे मूल्यांकन सक्षम सरकारी विभाग करणार
आरएफटी-एलएआरआर 2013 ट्आ अनुसूची दोनच्या तरतूदीनुसार मदत लाभ देणार.
दृष्टीक्षेपात प्रकल्प
मार्गाची लांबी- 649 किमी.
मार्गावर दहा स्थानके, आठ जिल्ह्यांतील 294 गावातून मार्गक्रमण
तीस तालुक्यांत कार्यक्षेत्र असेल
1197 हेक्टर भूसंपादन केले जाईल
300 किमी प्रतितास वेगाने रेल्वे धावणार
मुंबई ते हैदराबाद अंतर तीन तासात पार करणार
एका रेल्वेला दहा डबे व 750 प्रवासी क्षमता.
महाराष्ट्रातील सात स्थानकांवर रेल्वे थांबणार
सध्या सर्वेक्षण, रहदारीचा अभ्यास व सामाजिक परिमाण मूल्यांचा अभ्यास सुरु
पुणे जिल्ह्यात लोणावळा, पुणे, बारामतीत स्थानके होणार
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
दरम्यान, हाय स्पीड रेल्वेच्या मार्गास इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैठकीत उघड विरोध केला. हा प्रकल्प रेटायचा प्रयत्न झाल्यास आत्मदहन करु व त्यात मी आघाडीवर असेन, असा इशारा राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी दिला. विक्रम निंबाळकर, हेमंत निंबाळकर यांनीही शेतकऱ्यांच्या बागायती जमिनीतून हा मार्ग नेण्यास विरोध केला. रेल्वेला विरोध नाही, पण बागायती जमिनीतून मार्ग नेण्याऐवजी पूर्वीच्या कळंब, अकलजू, पंढरपूर मार्गाचा वापर करावा, अशी मागणी केली. रेल्वे प्रकल्पामुळे इंदापूर तालुक्यातील जमिनीचे दोन भाग पडतील. गेलेली जमीन कधीच पुन्हा शेतकऱ्यांना परत मिळणार नाही. शेतकऱ्यांना विस्थापित करुन हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा जाचक यांनी दिला. पहिला सर्वेक्षणाचा अहवाल वेगळा होता. नव्याने दिलेल्या अहवालात विशिष्ट लोकांच्या जमिनींना लक्ष्य केले आहे. हा अजिबात योगायोग नाही, असा आरोप जाचक यांनी केला. हा सर्वेक्षण अहवाल संशयास्पद असून तो मान्य नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.