नवी दिल्ली – क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा होतो असे दिशाभूल करणारे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या विषयावर शनिवारी बैठक झाली.
अशा अनियंत्रित व्यवस्थेमुळे हवाला व्यवहार होऊ शकतात किंवा दहशतवाद्यांना पैसा पुरविला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने या बैठकीत विचार करण्यात आला. यासंदर्भात अतिशयोक्तिपूर्ण दावे केले जातात. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या जातात. या जाहिराती थांबविण्याची गरज असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
क्रिप्टाकरन्सी हे क्षेत्र नवीन आहे. ते कसे विकसित होईल याकडे सरकारी यंत्रणाची नजर आहे. क्रिप्टोकरन्सीला भौगोलिक मर्यादा नाहीत. त्यामुळे समविचारी देशांना विचारात घेऊन या संदर्भातील धोरण ठरवावे लागणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. रिझर्व्ह बॅंकेने सुरुवातीपासून क्रिप्टोकरन्सीला विरोध केला आहे. यामुळे देशाच्या वित्तीय स्थिरतेला बाधा पोहोचू शकते असे मत रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अनेक वेळा व्यक्त केले आहे.